शेतमाल तारण कर्ज योजना शेतक-यांसाठी फायदेशीर – साहेबराव रोहोम

कोपरगाव प्रतिनिधी दि.१४ : महाराष्ट्र राज्य़ कृषिमंडळ, पुणे अंतर्गत कृषि उत्पन्न बाजार समिती कोपरगाव मार्फत शेतमाल तारण कर्ज योजना राबविण्यात येत असुन शेतक-यांचा शेतमाल वखार महामंडळाचे गोदामात ठेवून चालु बाजार भाव दराच्या ७५ टक्के रक्कम शेतक-याच्या बॅक खात्यावर आरटीजीएस /एनईएफटीव्दारे जमा करण्यात येते. जेव्हा बाजारात शेतमालाचे दर कमी असतात त्यावेळी शेतक-यांचे कमी दरात शेतमाल विक्री करून आर्थिक नुकसान होवू नये तसेच भविष्यात वाढणा-या भावाचा लाभ शेतक-यांना मिळावा यासाठी शेतमाल तारण कर्ज योजना ही शेतक-यासांठी फायदेशीर ठरणारी आहे.

सदर योजनेत स्वच्छ व चांगल्या प्रतीचा शेतमाल स्वीकारण्यात येतो. शक्यतो १२ टक्के पेक्षा अधिक आद्रता असलेला शेतमाल तारण कर्ज योजनेत स्वीकारला जात नाही. त्यामुळे शेतक-यांनी शेतमाल स्वच्छ करून व उन्हात वाळवून शेतमाल तारण कर्ज योजनेचा फायदा घेण्यासाठी वखार महामंडळाचे गोदामात शेतमाल ठेवल्यानंतर मिळालेल्या वखार पावती वर द.सा.द.शे. ६ टक्के व्याज दराने ६ महिन्यासाठी शेतक-यांना शेतमाल तारण योजनेत कर्ज पुरवठा करण्यात येतो. ६ महिन्याचे आत शेतमाल विक्री न केल्यास ८ टक्के व्याजाची आकारणी केली जाते. त्यामुळे शेतक-यांनी ६ महिन्याचे आत भाववाढ होईल तेव्हा शेतमाल विक्री करणे फायदेशीर ठरते.

तरी शेतकरी बांधवांनी आपल्या सोयाबीन शेतमालाची कमी दरात विक्री न करता शेतमाल साठवून ठेवून त्यावर शेतमाल तारण कर्ज योजने अंतर्गत ६% व्याज दराने कर्ज घेवून आपली तात्पुरती गरज भागवावी व भाववाढ होईल तेव्हा शेतमाल विक्री करून वाढणा-या भावाचा लाभ घ्यावा असे आवाहन कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती साहेबराव रोहोम, उपसभापती गोवर्धन परजणे व सर्व संचालक मंडळ तसेच सचिव नानासाहेब रणशुर यांनी केले आहे.