पिकविम्याची उर्वरित रक्कम शेतकरी बांधवांना त्वरित मिळावी – विवेक कोल्हे 

कोपरगाव प्रतिनिधी, दि. १९ : सन २०२३ मध्ये कोपरगाव मतदारसंघातील हजारो शेतकऱ्यांनी सोयाबीन आणि मका या खरीप पिकांचा विमा उतरविला होता. पर्जन्यमानानुसर सर्व्हे होवून त्याप्रमाणे शेतकरी पात्र झाले होते. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत निसर्गाच्या लहरीपणावर शेतकरी मात करतात. नैसर्गिक संकटाने झालेल्या नुकसानिपोटी मिळणारी पीकविमा रक्कम अद्यापही प्राप्त झालेली नाही तरीही लवकरात लवकर उर्वरित ७५% रक्कम पीक विमा कंपनीने शेतकऱ्यांच्या खात्यावर त्वरित वर्ग करावी यासाठी सूचना कराव्या अशी मागणी सहकार महर्षी कोल्हे कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांनी शासनाकडे केली आहे.

कधी अतिवृष्टी तर कधी दुष्काळाच्या झळा सहन कराव्या लागत आहेत. नैसर्गिक असमतोलाने उत्पादन घटले आहे. आर्थिक संकटाला सामोरे जात पीक उभे केलेले असते. त्यासाठी पीक विमा उतरवून शेतकरी काही प्रमाणात दिलासा मिळेल या आशेवर असतात. शासनाने काही कालावधीपूर्वी पीकविमा रकमेचे वितरण केले मात्र ते २५% टक्के अंतरिम विमा म्हणून देण्यात आले मात्र अद्यापही ७५% बाकी असल्याने शासनाने दखल घेण्याची गरज आहे. पीकविमा कंपन्या कोट्यावधी रुपयांचे विमे उतरवीतात मात्र प्रत्यक्ष शेतकऱ्यांना लाभ देण्याची वेळ येते तेव्हा वेळकाढूपणा होतो त्यावर कार्यवाही होऊन तातडीने कार्यवाही व्हावी.

शेतीसाठी पाटपाण्याचे नियोजन कोपरगाव मतदारसंघात पूर्णतः ढासळले आहे. शेती आधीच संकटात असताना आवश्यक मदत वेळेत न झाल्यास शेती व्यवसाय कसा करावा असा यक्ष प्रश्न शेतकरी वर्गासमोर आहे. यासाठी तातडीने उर्वरीत पीक विमा रक्कम शेतकऱ्यांना मिळावी अशी आग्रही मागणी विवेक कोल्हे यांनी केली आहे.

अहमदनगर जिल्हा बँकेचे संचालक युवानेते विवेक कोल्हे यांनी जिल्हा बँकेच्या माध्यमातून आवाहन करत शेतकऱ्यांना पीक विमा भरण्यासाठी पुढाकार घेतला होता. त्यामुळे पात्र लाभार्थी शेतकऱ्यांना तात्काळ मदत व्हावी अशी भावना शेतकरी वर्गात आहे.