शेवगाव प्रतिनिधी, दि. १६ : कापूस व तूरीला १५ हजार रुपये व सोयाबीनला ११ हजार रुपये प्रति क्विंटल तर उसाला ५ हजार प्रति टन भाव मिळावा या मागणीसाठी भारतीय कम्युनिस्ट पक्ष व अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने गुरुवार ( दि. १९ ) डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता तहसील कार्यालय, मार्केट कमिटी या ठिकाणी जोरदार निदर्शने आंदोलन करून निवेदन देण्यात येणार आहेत अशी माहिती भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सेक्रेटरी ॲड. सुभाष लांडे यांनी दिली.

यावेळी ॲड. लांडे यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, सध्या शेतकऱ्याचे कापूस, सोयाबीन, तुर विक्रीसाठी आलेले आहेत. या काळात खाजगी व्यापार्यांनी शेतक -यांची अक्षरशः लूट चालवली आहे. मागिल वर्षी तुर अकरा हजार पर्यंत, दोन वर्षांपूर्वी कापूस अकरा हजार रुपये पर्यंत भाव मिळाला होता चालू वर्षी मात्र तूर, कापूस, सोयाबीन यांचे भाव खूपच पाडण्यात आले आहेत.

जिल्हयाबाहेर उसाला विनय कोरे यांच्या कारखान्याने पहीली उचल ४३०० रूपये जाहीर केली आहे. संगमनेर व काही कारखाने ३५०० रूपये पर्यंत भाव देतात. परंतु आपल्या परिसरातील कारखाने तीन हजार रुपयाच्या आत भाव देत आहेत हे शेतकऱ्यावर अन्याय करणारे आहे. सर्व गोष्टींची भाववाढ होत असताना शेतकऱ्याना मात्र हमी भाव मिळत नाही. शेतीमाल उत्पादन खर्च मोठ्या प्रमाणात वाढलेला असताना शेतक -यांकडे माल आल्यावर मात्र भाव पाडले जातात म्हणून सरकारने हमी भाव कायदा करावा अशी मागणी करण्यात आली आहे.

यासाठी किसान सभा व भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने वतीने गुरुवार दिनांक १९ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता तहसील कार्यालय, मार्केट कमिटी या ठिकाणी निदर्शने आंदोलन करून निवेदन देण्यात येणार आहे. भारतीय कम्युनिस्ट पक्षाची आज शेवगाव येथे बैठक झाली. यावेळी कॉ. ॲड सुभाष लांडे, संजय नांगरे, बापूराव राशिनकर, भगवानराव गायकवाड,बबनराव पवार, संदिप इथापे, राम लांडे, बबनराव लबडे,दत्ता आरे, वैभव शिंदे, बाळासाहेब म्हस्के, आत्माराम देवढे, अशोक नजन, कारभारी वीर, ॲड. भागचंद उकिरडे, अविनाश गायकवाड, गोरक्षनाथ काकडे, नारायण भिसे, शिवाजी भुसारी, अर्जुन खैरे आदी उपस्थित होते.

