कोपरगाव प्रतिनिधी, दि. ५ : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त अहिल्यादेवींनी उभारलेल्या ऐतिहासिक जलसंपत्तींच्या जतनासाठी एक महत्त्वपूर्ण आणि लोककल्याणकारी निर्णय नुकताच घेण्यात आला आहे. दिनांक ६ मे २०२५ रोजी मौजे चौंडी, ता. जामखेड, अहिल्यानगर येथे मंत्री परिषदेच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत अहिल्यादेवींच्या कार्याचा गौरव राखण्यासाठी व ऐतिहासिक जलसंपत्तीचे जतन करण्याच्या दृष्टिकोनातून व्यापक योजना आखण्यात आली.

यात पुणतांबा येथील गोदावरी घाटाचा समावेश झाल्याने यापूर्वीच सहकार महर्षी कोल्हे कारखाना अध्यक्ष युवानेते विवेक कोल्हे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे विविध देवस्थान आणि तीर्थक्षेत्र विकास नाशिक येथे होणारा सिंहस्थ कुंभमेळा पार्श्वभूमीवर व्हावा अशी मागणी केलेली होती त्यातील पुणतांबा येथील मागणी पूर्ण होत असल्याने मुख्यमंत्री व शासनाने त्यांनी आभार व्यक्त केले आहे.

या निर्णयाअंतर्गत राज्यभरातील पुण्यश्लोक अहिल्यादेवींनी उभारलेले तलाव, विहिरी/बारव, कुंड, घाट यांची दुरुस्ती, गाळ काढणे, पुनरुज्जीवन व सुशोभीकरण करण्याच्या कामांना मान्यता देण्यात आली आहे. या कामांची अंमलबजावणी मृद व जलसंधारण विभागामार्फत केली जाणार असून सध्या प्राथमिक संकलनात ३ तलाव, १९ विहिरी/बारव, ६ कुंड व ६ घाट अशा एकूण ३४ जलस्रोतांचा समावेश करण्यात आला आहे.

विशेष बाब म्हणजे या योजनेत कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील पुणतांबा येथील गोदावरी नदीवरील ऐतिहासिक घाटाचा समावेश करण्यात आलेला आहे. या निर्णयामुळे पुणतांबा येथील घाटाचे जतन, दुरुस्ती आणि सुशोभीकरण करून भाविक व पर्यटकांसाठी अधिक सुविधा निर्माण होतील.याबाबत प्रतिक्रिया व्यक्त करताना युवानेते विवेक कोल्हे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आणि शासनाचे मनःपूर्वक आभार मानले आहेत.

सिंहस्थ कुंभमेळा नाशिक येथे होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी मुख्यमंत्री महोदयांकडे विविध तीर्थक्षेत्रांच्या विकासासाठी विशेष प्रयत्नांची मागणी केली होती. त्यातूनच कोपरगाव मतदारसंघातील पुणतांबा गोदावरी घाटाचा समावेश झाल्याने हा निर्णय अत्यंत स्वागतार्ह व जनतेच्या भावना जपणारा ठरला आहे, असे मत विवेक कोल्हे यांनी व्यक्त केले.

ही योजना पुण्यश्लोक अहिल्यादेवींना अभिवादन करत त्यांच्या ऐतिहासिक वारशाचे जतन करणारी असून ती भावी पिढ्यांसाठी अमूल्य ठरेल, व होऊ घातलेल्या कुंभमेळ्यासाठी हा निर्णय अतिशय मोलाचा आहे असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. यासह चासनळी, मंजूर, कुंभारी, कोपरगाव शहरील विविध देवस्थाने, संवत्सर, कोकमठाण यासह ३० ते ३५ गावांना गोदावरी तीर लाभला आहे त्यामुळे ऐतिहासिक महत्व असणाऱ्या कोपरगाव मतदारसंघातील इतरही देवस्थानांना लवकरच या प्रकारचा निर्णय सरकार घेईल अशीही मागणी केलेली आहे. तिलाही लवकरच यश मिळेल अशी अपेक्षा कोल्हे यांनी व्यक्त केली आहे.
