कोपरगाव प्रतिनिधी, दि. १५ : कोपरगाव नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार राजेंद्र झावरे आणि प्रभाग क्रमांक ८ चे नगरसेवक पदाचे उमेदवार वर्षा प्रफुल्ल शिंगाडे व किशोर (सनी) बाबुराव काळे यांच्या प्रचारार्थ आयोजित कॉर्नर सभेत जिल्हाप्रमुख नितीन औताडे यांनी नागरीकांशी संवाद साधला.

जिल्हाप्रमुख नितीन औताडे म्हणाले की, ही लढाई काळे, कोल्हे आणि शिवसेना यात राहणार आहे. गेल्या ५० वर्षांमध्ये तालुक्याचे नेतृत्व व नगरपालिकेची आणि तालुक्याची सत्ता यांच्याकडे होती. इतकी वर्षे यांच्याकडे सत्ता असताना सुद्धा, हे विकासाचे व्हिजन लोकांपुढे मांडत आहेत? मग यांनी आतापर्यंत काय केले? जर विकास केला असता, तर ‘व्हिजन’ दाखवायची गरज नसती. हे आज सांगताय की, ‘आम्ही विकास करू’ आणि आम्ही सांगतो की, ‘आम्ही हा विकास या आधीच २००१ ते २००६ साली केला आहे.’ हा आमच्यातला आणि यांच्यातला फरक आहे.

४००० कोटींचा जर विकास झाला असता, तर इथला एकही प्रश्न राहिला नसता. ग्रामीण भागातल्या लोकांना वाटायचे शहरात विकास झाला, शहरी भागातल्या लोकांना वाटायचे ग्रामीणमध्ये विकास झाला. जेव्हा आम्ही चौकशी केली, तेव्हा आम्हाला असे कळाले की हे सर्व थोतांड आहे.

मला २ ठिकाणी विकास सापडला, आमदारांच्या पीएने बांधलेला ५ कोटींचा बंगला आणि माहेगावचा ५० कोटींचा बंगला. काळे- कोल्हे यांचे उमेदवार स्वावलंबी आहेत का? ते सभागृहात काम करू शकतील का? त्यांना स्वतःचा विचार नाही. त्यांना कारखान्यावरून जे सांगितले जाईल ते करणारे त्यांचे उमेदवार आहे. तसा आपला उमेदवार नाही. साईबाबा तपोभूमी कोणाच्या ताब्यात आहे. ५० एकर ३३ गुंठे जमीन ह्या दोन नेत्याच्या ताब्यात आहे. त्यांनी तो स्वतःचा राजकीय अड्डा बनवला आहे.

त्यांच्या काळात कामांच्या माध्यमातून फक्त टक्केवारीत सुरु आहे. अवैध धंदे देखील त्याच्याच कार्यकर्त्यांचे आहे. सहा वर्ष तुम्हांला अवैध धंदे दिसले नाही आणि आता हे नेत्यांना निवेदन देत आहे. तुमच्याकडे २० तारखेला हे पैसे वाटणार आहे. हा पैसा टक्केवारी, वाळू, अवैध धंद्याचे आहे. तुमचे आजोबा सत्तेत, वडील सत्तेत, तुम्ही सत्तेत तरी इथून पुढे विकास करणार व विकासाचा पुळका तुम्हांला आत्ता आला का? असा सवाल त्यांनी प्रस्थापित नेत्यांना विचारला आहे.

माझे खूप कौतुक सगळ्यांनी केले, पण मी २००१ ते २००६ साली नगराध्यक्ष म्हणून मी माझे कर्तव्य पार पाडले व मला जे जे विकास कामे सुचत गेले, ते ते मी करत गेलो. मला पुन्हा संधी द्या, अजून खूप विकास करू. आम्ही शंभर टक्के शिंदे साहेबांना विनंती करू आणि तुम्हाला ७/१२ देऊ असे मत नगराध्यक्ष पदाचे उमेदवार राजेंद्र झावरे यांनी व्यक्त केले.

यावेळी बोलताना महिला आघाडी जिल्हाप्रमुख विमलताई पुंडे म्हणाल्या की, माजी नगराध्यक्ष राजेंद्र झावरे यांच्या २००१ ते २००६ च्या नगराध्यक्षपदाच्या कार्यकाळामध्ये छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे पुतळे यासह संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज व्यापारी संकुल, जनार्दन स्वामी मौनगिरी सेतू, भाजी मार्केट यासह अनेक विकास कामे केलेली आहेत. तदनंतर कोपरगाव शहरात कुठल्याही प्रकारचा विकास या दोन्ही प्रस्थापित नेत्यांनी केलेला नाही. त्यामुळेच जनसेवेसाठी राजेंद्र झावरे यांना पुन्हा शहराचा विकास साधण्यासाठी निवडून द्यावे. यावेळी नगरसेवक पदाच्या उमेदवार वर्षा शिंगाडे, किशोर (सनी) बाबुराव काळे, ॲड.श्रीनिवास डागा, किरण खर्डे, राहुल देशपांडे व स्थानिक नागरिकांनी आपले मत व्यक्त केले.

यावेळी दत्ता पुंडे, उपजिल्हाप्रमुख मनिल नरोडे, शहरप्रमुख अक्षय जाधव, सोमनाथ शिंगाडे, सिंधूताई शिंगाडे, इरफान शेख, विकास शर्मा, शेखर कोलते, विक्रांत झावरे, अभिषेक आव्हाड, विशाल झावरे, वैभव चव्हाण, निशांत झावरे, नंदन घाडगे, संतोष झावरे, पिंटू पावशे, अभिजित जाधव, अमोल खरात, दीपक दळे, प्रेम जपे, दीपक मरसाळे, दीपक बरडे, सुशील बोर्डे, मणियाल बोर्डे, रोहित बरदे, करण डहाके, संतोष शिवदे, ऋषिकेश धुमाळ, अजय शिंगाडे, राजू निकम, रोहित बरडे, गोकुळ हंडोरे, जुबेर अत्तार, बंटी दळवी, बंटी दारुंटे, रवि पवार, प्रितम गाडे, प्रेम जपे, आदिसह मोठया प्रमाणावर नागरिक उपस्थित होते.


