दोन समाजात तेढ निर्माण करणाऱ्या मास्टरमाईंडला तडीपार करा – विमल पुंड

कोपरगावमध्ये सकल हिंदू समाजाच्या मोर्चाने स्थानिक प्रशासनाचे लक्ष वेधले

कोपरगाव प्रतिनिधी, दि.३१ : कोपरगाव शहरात रविवारी दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. त्यात अनेक जन जखमी झाले एकमेकांविरुद्ध पोलीसात गुन्हे दाखल झाले. माञ, दोन समाजात तेढ निर्माण करणारा खरा मास्टरमाईंड जो आहे. त्याला त्वरीत अटक करुन त्याच्यावर गुन्हा दाखल करावा तसेच त्याला तडीपार करावे. अशी मागणी शिवसेनेच्या महिला तालुका प्रमुख विमल पुंड यांनी केली.

रविवारी सायंकाळी गांधीनगर येथील शंकर गार्डनमध्ये लहान मुलं खेळणी खेळण्यावरून वाद झाला त्यात मोठ्यांनी उडी घेतली आणि दोन गटात तुंबळ हाणामारी झाली होती. झालेल्या प्रकाराचा निषेध करण्यासाठी व या हाणामारीच्या मास्टरमाईंड जो कोणी असलेला त्याला त्वरीत अटक करून तडीपार करण्याच्या मागणीसाठी मंगळवारी सकाळी कोपरगाव सकल हिंदूच्यावतीने कोपरगाव शहर पोलीस स्टेशन व नगरपालिकेवर मोर्चा काढण्यात आला.

शहरातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारका पासुन मोर्चाला सुरुवात झाली या मोर्चात माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे, विमल पुंड, दत्ता काले, विनायक गायकवाड, संतोष गंगवाल, सुशांत खैरे, संतोष चवंडके, यांचा मुख्य सहभाग होता. शेकडो हिंदू बांधव जय श्रीरामच्या घोषणा देत मोर्चात सहभागी होते.

पोलीस स्टेशन परिसरात मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. यावेळी विमल पुंड म्हणाल्या की, त्या प्रभागाचे माजी नगरसेवक हाजी मेहमूद सय्यद हे शंकर गार्डनमधील खेळणी व ओपन जीमचे साहित्य हाटवून ती जागा मोकळी करण्याची मागणी करीत होते. २५ जानेवारीला त्यांनी नगरपालीकेसमोर  उपोषणाला बसले होते. तेव्हा त्यांनी प्रसिध्दी माध्यमासह पोलीस व पालिका प्रशासनाला उघडपणे आगोदरच सांगितले होते की, जर गार्डनमधील खेळणी हाटवले नाही. तर जातीय दंगल होवू शकते असे चिथावणीखोर बोलले आणि पुढे २८ जानेवारीला अगदी तसेच घडले.

यावरून दोन समाजात तेढ निर्माण करुन दंगली घडवण्याची पुर्व तयारीत असलेले खरे मास्टरमाईंड हे सय्यद आहेत. शहरात इतर ठिकाणी हिंदू मुस्लिम गुण्यागोविंदाने राहतात इतर ९ ठिकाणीही खासदार सदाशिव लोखंडे यांच्या निधीतून खेळणी व महिलांसाठी जिम बसवण्यात आल्या आहेत. मग गांधीनगर मध्येच का दोन समाजात तेढ निर्माण झाले यामध्ये सय्यद यांचा हात आहे. तेव्हा पोलीसांनी सय्यद यांची पार्श्वभूमी तपासून त्यांना तडीपार करावे अशी मागणी करीत पोलीसांच्या कार्यपद्धती वर शंका उपस्थित केली.

यावेळी माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे म्हणाले, दोन समाजात तेढ निर्माण करुन दंगल घडवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांचा पोलीसांनी वेळेत बंदोबस्त  करावा. आम्ही कोणत्या समाजाच्या विरोधात नाही पण समाजातील विकृतीला विरोध आहे. बाहेरुन आलेले काही समाजकंटक दोन समाजात द्वेष वाढवत आहेत. शहराची शांतता भंग करणाऱ्यांचा बंदोबस्त करा.

पोलिसांचा वचक कमी झाला आहे. शहरात अवैध व्यवसाय वाढले, राशनचे धान्य काळ्या बाजारात खुले आम विकले जाते. शासकीय जागेत अवैध व्यवसाय सुरु आहेत. काही लोकांची दादागिरी वाढली आहे. त्यामुळे दोन समाजात वाद वाढत आहेत. यापुढे सकल हिंदूंनी राजकारण बाजूला ठेवून एकञ आले पाहिजे. 

पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके व मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांनी हिंदू समाजाच्यावतीने आपल्या विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यावेळी आक्रमक झालेल्या मोर्चेकऱ्यांशी बोलताना पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके म्हणाले की, झालेल्या घटनेची सखोल चौकशी करून योग्य ती कारवाई करण्यात येईल. तसेच शहरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवणार असल्याचे सांगितले.

तर मुख्याधिकारी शांताराम गोसावी म्हणाले की, गांधीनगर येथील शासकीय मोकळ्या जागेत गार्डन व खुली जीम करण्यासाठीचा ठरवा मंजुर झालेला असल्यामुळे ती जागा इतर कारणांसाठी वापरता येणार नाही. उलट पालिकेच्या वतीने तिथे संरक्षण भिंतीस विविध वृक्ष लागवड करुन गार्डन सुशोभीकरण करू असे आश्वासन दिले. पोलीस व नगरपालिका प्रशासनाच्या संयमी भूमिकेमुळे शहरातील तणावग्रस्त वातावरण निवळले आहे.

कोपरगावमध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख, संदीक कोळी यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.