संजीवनी अकॅडमीत वार्षिक स्नेहसंमेलन जल्लोषात संपन्न 

कोपरगाव प्रतिनिधी, दि.०३ : सध्या शाळेत शिकत असणाऱ्या मुला मुलींची बॅच ही भारताची जगात सर्वात मोठी अर्थव्यवस्था करणारी बॅच आहे. म्हणुन स्वतः शिस्त पाळुन त्यांच्यात संस्कार रूजवा. नाहीतर इंस्टाग्राम, सोशल मीडियावरील राक्षस (वाईट आशयाच्या पोस्टस्) त्यांना खाऊन टाकतील. मोबाईचा वापर फक्त संवाद साधण्यासाठी करा. तुमची एक कौतुकाची टाळी, तुमची शाबासकी त्यांना प्रोत्साहीत करेल.

त्यांना ‘स्वकृत’ करा, त्यांचे ‘परावलंबित्व’ दुर होईल, असे आवाहन ‘पूर्णब्रम्हा’ या जगातील सर्वात मोठ्या असलेल्या महाराष्ट्रीयन न रेस्टॉरंटच्या संस्थापिका व आगामी काळात ५००० रेस्टॉरंटस् सरू करण्याचा माणस असलेल्या जयंती कठाळे यांनी पालकांना केले. संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स संचलित संजीवनी अकॅडमीचे वार्षिक स्नेहसंमेलन १ ली ते ४ थी व ५ वी ते ९ वी च्या विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र दोन दिवस घेण्यात आले. प्रथम दिवसाच्या प्रमुख पाहुण्या म्हणुन कठाळे बोलत होत्या. तर दुसऱ्या दिवशीच्या  प्रमुख पाहुण्या महाराष्ट्राची  हास्यजत्रा या विनोदी मालिकेतील अभिनेत्री शिवाली  परब होत्या.

यावेळी माजी आमदार स्नेहलता कोल्हे, कलावती कोल्हे, तसेच कोपरगाव येथिल अनेक वर्षांपासून वैद्यकिय सेवा देणारे डॉ. डी. एस.मुळे व डॉ. रमेश  कोठारी विशेष अतिथी म्हणुन उपस्थित होते. सदर प्रसंगी संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे  मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे, संजीवनी ग्रुप ऑफ स्कूल्सच्या संचालिका डॉ. मनाली कोल्हे, प्राचार्या शैला झुंजारराव उपस्थित होते. पालकांची उपस्थिती उल्लेखनिय होती. यावेळी प्राचार्या झुंजारराव यांनी सर्वांचे स्वागत करून शालेय  कामकाजाचा वार्षिक अहवाल सादर केला तर उपप्राचार्या प्रिती राय यांनी प्राथमिक विभागाचा अहवाल सादर केला.

विद्यार्थ्यांना मोबाईलचे व्यसन लागू नये, याची पुष्टी  देताना कठाळे म्हणाल्या की, राज्यसभेच्या खासदार, सामाजिक कार्यकर्त्या सुधा मूर्ती यांचे जावई ऋषि सुनक हे युनायटेड किंग्डमचे (युके) पंतप्रधान आहे. त्यांनी सर्व शाळांमध्ये मोबाईल बॅन केले आहे. तसे आपणही केल्यास मुलं मोबाईलच्या व्यसनापासून दूर राहतील. तसेच त्यांनी पालकांना सांगीतले की आपल्या मुलांना रोज ‘गणपती बाप्पा मोरया’ मोठ्याने म्हणायला लावा. यामुळे जठराग्नी आणि मेंदु यांची जोडणी स्वच्छ होते, व मेंदुची कार्यक्षमता वाढते.

दुसऱ्या दिवशीच्या प्रमुख पाहुण्या शिवाली परब म्हणाल्या की वार्षिक स्नेहसंमेलनाच्या सांस्कृतिक कार्यक्रमात बाल कलाकारांना आपली कला सादर करण्याचे व्यासपीठ मिळते. त्या कलेतुन त्यांच्यातील प्रतिभेचा आविष्कार होतो. यातुनच पुढे ते मोठे कलाकार होवु शकतात, म्हणुन पालकांनी आपल्या पाल्यांची कला जोपासन्यासाठी प्रोत्साहन द्यावे.  

माजी आमदार स्नेहलता कोल्हे म्हणाल्या की, संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे संस्थापक स्व. शंकरराव कोल्हे यांना अभिप्रेत असणारे शिक्षण  संजीवनीच्या सर्वच संस्थांमधुन दिले जात असल्यामुळे विद्यार्थ्यांची चांगली प्रगती होत आहे. डॉ. मनाली कोल्हे म्हणाल्या की, संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे अध्यक्ष नितिन कोल्हे व मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२०’ च्या समांतर असे अनेक उपक्रम शाळेत राबविण्यात येत असुन येथिल शिक्षक वर्गही अत्यंत मेहनती आहे.

याचा परीपाक म्हणुन आयआयटी सारख्या संस्थांमधुन विद्यार्थ्यांनी बक्षिसांची लयलूट केली आहे. तसेच राष्ट्रीय पातळीवरही खेळ, सांस्कृतिक, अशा  अनेक स्पर्धांमध्ये विद्यार्थी बक्षिसांचे मानकरी ठरत आहेत. भविष्याचा वेध घेत शालेय पातळीवरच विद्यार्थ्यांना कोडींग, रोबोटिक्स, अशा विषयांचे प्रशिक्षण देवुन सराव करून घेतला जात आहे. तसेच संशोधनाचा पाया आत्तापासुनच रुजविला जात आहे.

डॉ. मुळे व डॉ. कोठारी यांनीही येथे विविध उपक्रम राबविल्या जात असल्यामुळे संजीवनी अकॅडमीचे कौतुक केले. यावेळी विद्यार्थ्यांनी साहसी, थरार, विनोदी, अशा संकल्पनांवर सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली. व्यावसायिक रंगभूमीला साजेसा रंगमच, उत्कृष्ट ध्वनी व्यवस्था व लाईट इफेक्टस्, भव्य आसन व्यवस्था, विद्यार्थ्यांनीच सादर केलेल्या संगीतमय रचना, नृत्य, इत्यादींना रसिक प्रेक्षकांकडून प्रत्येक सादरीकरणानंतरची दाद, मराठी, हिंदी आणि अस्खलित इंग्रजी मधुन विद्यार्थ्यांनीच केलेले सुत्रसंचालन, या सर्व बाबींमुळे सांस्कृतिक कार्यक्रम संस्मरणीय ठरला, असे मत उपस्थित पालकांनी व्यक्त केले. तसेच बाल कलाकारांनी संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे संस्थापक स्व. शंकरराव कोल्हे यांच्या जीवन प्रवासावर  डॉक्युमेंटरी सादर करून त्यावर अभिनय केला. हा कार्यक्रम खास आकर्षण ठरले.