शेवगाव प्रतिनिधी, दि. २८: शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदारसंघांमध्ये लोकसभा निवडणुकीमध्ये ज्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीच्या उमेदवाराचे काम प्रामाणिकपणे केले त्याच कार्यकर्त्यांना विधानसभेची उमेदवारी दिली पाहिजे असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी व्यक्त केले. येथील शुभम मंगल कार्यालयात आयोजित विस्तारित कार्यकारणी सभेत अध्यक्षपदावरून ते बोलत होते.
यावेळी बोलताना फाळके म्हणाले, पक्षामध्ये काम करण्यासाठी कार्यकर्त्यांना संधी द्यावीच लागते. मात्र कार्यकर्त्यांनी शिस्त पाळली पाहिजे. कुठल्याही प्रकारचा वाद न घालता कुठलेही मतभेद न ठेवता संघटना मजबूत करायची आणि विधानसभेमध्ये आपला उमेदवार निवडून देण्याचे काम प्रामाणिकपणे करायचं. विधानसभेला प्रताप काकांनाच निवडून द्यायचं हे शेवगाव पाथर्डीतील जनतेने ठरवलेले आहे. लोकांनी निवडणूक हातात घेतली तर यश मिळाल्याशिवाय रहात नाही. त्यामुळे पक्ष संघटना मजबूत करा, बुथ कमिट्या करा आणि ज्येष्ठ नेते शरद पवारांच्या ताब्यात महाराष्ट्र देऊन शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्याची संधी द्या.
लोकसभा निवडणुकीमध्ये शेवगाव – पाथर्डी विधानसभा मतदारसंघातील मतदारांनी आपल्या उमेदवाराला मताधिक्य दिले. त्याबद्दल मतदारांचा मी आभारी आहे. यापेक्षा अधिक काम आपल्याला येत्या विधानसभा निवडणुकीसाठी करायचे आहे. त्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी सज्ज व्हावे.
ॲड. प्रताप ढाकणे म्हणाले, शरदचंद्र पवार हे श्रेष्ठ विचारांचे विद्यापीठ आहे त्यावर निष्ठा ठेवणारा मी एक सामान्य कार्यकर्ता आहे. राजकारणामध्ये अनेक पद येतात, सत्ता येते आणि जाते मात्र विचार हा कायम राहणारा आहे, अहंकाराला पराभूत करायचे ही जीद्द सर्वसामान्य माणसाने लोकसभा निवडणुकीत तळमळीने काम करणाऱ्याला विजयी करून सिद्ध केले आहे.
शेवगाव पाथर्डी मतदार संघात विद्यमान लोकप्रतिनिधीच्या दूर्लक्षामुळे वीज, पाटपाणी, पिण्याचे पाणी, रस्ता आदि मुलभूत समस्या कायम असल्याने आपल्याला संधी मिळाली तर आमदार काय असतो हे जनतेला दाखवून देईन. सर्व सामान्य माणसाला त्रास होत असेल तर सत्ता असो वा नसो त्याच्या मागे मी खंबीर पणे उभा असेन अशी ग्वाही त्यांनी शेवटी दिली.
रामराव चव्हाण, अरविंद सोनटक्के, शंकर काटे, मल्हारी आव्हाड बाळासाहेब डाके, वजीर पठाण, बद्री अण्णा मडके, बंडूपाटील बोरुडे सविता भापकर यांची ही भाषणे झाली. यावेळी केदारेश्वरचे अध्यक्ष ऋषिकेश ढाकणे, एजाज काझी, राहूल मगरे, सुभाष लांडे, इब्राहीम पठाण, रज्जाक बेग, महारुद्र कीर्तने, गहिनीनाथ शिरसाठ, विद्या गाडेकर, प्रकाश घनवट, प्रताप फडके, सुरेशचंद्र होळकर, आयुब पठाण, शरद सोनवणे आदिसह शेवगाव पाथर्डी तालुक्यातील कार्यकर्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमात संघटनेच्या नूतन पदाधिकाऱ्यांना नियुक्त पत्र वितरीत करण्यात आली. केदारेश्वरचे उपाध्यक्ष माधव काटे यांनी स्वागत करून प्रास्ताविक केले. दीपक कुसळकर यांनी सुत्रसंचलन केले तर हरिष भारदे यांनी आभार मानले.