गोदावरी नदी पात्रात पाणी सोडून नागरिकांच्या जखमेवर मीठ चोळले – सुनिल  देवकर

कोपरगाव प्रतिनिधी, दि. १३ :  गेल्या दोन चार दिवसांपासून नांदूर मधमेश्वर धरणांतून गोदावरी नदी पात्रात पाणी सोडून शासनाने कोपरगाव तालुक्यातील शेतकऱ्यांसह सामान्य नागरिकांच्या जखमेवर जणू मीठ चोळले असल्याची भावना कोपरगाव पंचायत समितीचे माजी सभापती तथा प्रगतशील शेतकरी सुनिल अंबादास देवकर यांनी व्यक्त करत पाटबंधारे विभागाचा निषेध व्यक्त केला आहे.

माजी सभापती देवकर यांनी म्हटलेआहे की, पावसाळा सुरू होऊन एक महिना उलटला असतांना पाऊस येईल या आशेने काही शेतकऱ्यांनी शेतात हजारो रुपये घालत पेरणी केली आहे परंतु अद्यापही कोपरगाव तालुक्यात म्हणावा असा पाऊस पडला नसल्याने शेतकरी राजा मेटाकुटीला आला असून अनेकांचे बोअरवेल व वहिरींनी देखील तळ गाठला आहे. तर विशेष म्हणजे कोपरगाव शहरासह गाव खेड्याना पिण्याचा पाण्याचा पुरवठा करणारी पाणी साठवण तलावाने देखील तळ गाठल्यान पिण्याचा पाण्याचा मोठा यक्ष प्रश्न निर्माण झाला असून कोपरगाव शहरातील नागरिकांना तर १२ दिवसाआड पिण्याचा पाण्याचा पुरवठा होत असल्याने कोपरगाव कर पुरते हैराण झाले आहे. शहरातील अनके मोलमजुरी करणाऱ्या कुटूंबाना आपले काम सोडुन पाणी येण्याचा दिवशी घरी बसावे लागते.

त्यामुळे कोपरगाव तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पिकांची व  नागरिकांची पिण्याच्या पाण्याची इतकी वाईट परिस्थिती झाली असताना पाटबंधारे विभागाने गोदावरी नदीपात्रात सोडलेले जायकवाडीच्या दिशेने जाणारे हे पाणी जर गोदावरी डाव्या व उजव्या कालव्यात सोडले असते तर परिसरातील शेतकऱ्यांना आपल्या शेतीला पाणी देता आले असते यामुळे बंद पडलेल्या विहिरी व बोअरवेल देखील सुरू झाले असते आणि विशेष म्हणजे गावांना पिण्याचा पाण्याचा पुरवठा करणारे तलाव भरले गेलं असते.

यामुळे शहरासह नागरिकांचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न मिटला असता परंतु पाटबंधारे खात्याने अत्यंत चुकीच्या पद्धतीने नियोजन करत ऐन दुष्काळात गोदावरी नदी पात्रात पाणी सोडून गोदावरी उजव्या व डाव्या कालव्यावर अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्यांवर व नागरिकांवर जणू अन्याय केला असल्याची भावना देवकर यांनी व्यक्त करत पाटबंधारे विभागाचा निषेध व्यक्त केला आहे.