बालगोपाळांच्या दिंडीने कोपरगांव दुमदुमले

कोपरगाव प्रतिनिधी दि. १६ : कोपरगांव शहरातील जुने गावठाण भागात ग्रामदैवत दक्षिणमुखी हनुमान मंदिरातील विठ्ठल-रुख्मिनी मंदिर आणि सोमेश्वर महादेव मंदिरात विविध शाळांच्या बालगोपाळांच्या दिंडी आगमनाचे विठूचा गजर करत परिसर दुमदुमून गेला. आषाढी एकादशीच्या पुर्वदिनी कोपरगांव शहरातील शिशु विकास मंदिर, विद्या प्रबोधिनी शाळा, संत ज्ञानेश्वर इंग्लिश मेडिअम स्कूल, कोपरगांव नगरपरिषदेचे एम. के. आढाव विद्यालयाने दिंडीचे आयोजन कोपरगांव शहरातील गावठाण भागात केले होते. 

याप्रसंगी दिंडीचे मराठा पंच मंडळ ट्रस्ट कोपरगांवचे ग्रामदैवत दक्षिणमुखी हनुमान मंदिर, विठ्ठल-रुख्मिनी मंदिर आणि श्रीमंत पवार सरकारचे सोमेश्वर महादेव देवस्थानचे वतीने दिंडीचे पुजन करून बालगोपाळांना खाऊ वाटप करत स्वागत करण्यात आले. या प्रसंगी मराठा पंच मंडळ ट्रस्टचे अध्यक्ष अॅड. संजय भोकरे, विश्वस्त बाळासाहेब नरोडे, प्रकाश गवारे, मंदार आढाव, कारभारी नजन, रोहित वाघ, साई नरोडे, कैलास आढाव,सेवेकरी भास्कर ठोंबरे, श्रीमंत पवार सरकारचे सोमेश्वर महादेव देवस्थानचे प्रमुख महेंद्र पाटील,

मुख्य कार्यकारी अधिकारी सुशांत घोडके, व्यवस्थापक नारायण अग्रवाल, जयंत विसपुते, श्री दत्तपार देवस्थानचे विश्वस्त हेमंत पटवर्धन,संत ज्ञानेश्वर स्कूलचे संचालक विशाल झावरे, विद्याप्रबोधीनीचे विश्वस्त दिनेश दारुणकर,मुख्याध्यापक दत्तात्रेय गवळी, मुख्याध्यापिका संत ज्ञानेश्वर स्कूलचे प्राचार्य सचिन मोरे, एम. के. आढाव विद्यालयाच्या मुख्याध्यापिका भावना गवांदे (खैरनार), जयश्री आहेर, गोरक्षण महिला भजनी मंडळाच्या सदस्या, शाळांचे शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

मराठा पंच मंडळ ट्रस्टचे ग्रामदैवत दक्षिणमुखी हनुमान मंदिरात विठ्ठल-रुख्मिनीचे मंदिर आहे. विठ्ठलभक्त ह.भ.प. बाबुराव नरोडे महाराज यांनी असंख्य भाव-भक्ती गीते याच मंदिरात गायली आहेत.त्यांच्या भक्ती भजनाचे कर्णमधुर स्वर आकाशवाणी केंद्रावर उमठले. त्यांना ‘रेडिओस्टार’ हा किताब बहाल झाला.संत रामदासीबाबा हेही या मंदिरात येत असत. संगीतकार गायक आनंदराव आढाव यांनीही येथे सेवा दिली आहे. आजही येथे काकड आरतीची परंपरा आहे.

विविध शाळांच्या दिंडीत विठ्ठल,रुख्मिनी,संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत मुक्ताबाई, संत सोपानकाका, संत निवृत्ती, संत एकनाथ, संत गोरोबाकाका यांचेसह विविध संत आणि वारकरी वेशभूषेतील मुले-मुली सहभागी झाले होते.हाती वारकरी भगवा झेंडा,डोक्यावर तुळस, गळ्यात टाळ आणि मुखी हरिनामाचा गजर करत शाळांच्या दिंड्या गावठाणात जमल्या.सर्व शिक्षा अभियान,स्वच्छता,वृक्षारोपण-पर्यावरण, बेटी बचाओ-बेटी पढाओ असे विविध सामाजिक संदेश फरक विद्यार्थ्यांचे हाती होते. 

याप्रसंगी आषाढी वारीचे महत्व, दिंडींची परंपरा मानव जातीला सामाजिक समरसता आणि भेदभाव निर्मूलनाचा संदेश देत असल्याचे विद्यार्थांनी केलेल्या मनोगतात व्यक्त केले. गोरक्षण महिला भजनी मंडळ यांनी भजन गायले. शहरात विविध ठिकाणी रिंगण सोहळा झाला. तसेच फुगडी, झांज, भक्ती गीतांवर तल्लीन होवून नृत्य सादर केले.

गोदातीरावर पुराणकालीन ऋषी-मुनी, साधू-संत, राजे-महाराजे यांचे पदस्पर्शाने आणि सहवासाने पावन झालेल्या कोपरगांव भुमीत शालेय शिक्षणाचे माध्यमातून प्रथा आणि परंपरा जोपासण्याचा भावी पिढीने वारसा जपलेल्याबद्दल गांवक-यांनी कौतुक केले आहे.