श्रमिक मजदुर संघाच्या लढ्याला यश

शालेय पोषण आहार कामगाराच्या मानधनात एक हजार रुपयांची वाढ

कोपरगाव प्रतिनिधी, दि. २६ : भारतात सर्वात कमी पगारावर काम करणारे कर्मचारी म्हणजे शालेय पोषण आहार योजनेतील कर्मचारी होय. ही योजना 2003 सालापासून सुरु झाली आहे. सुरुवातीला फक्त 300 रुपये दरमहा इतके मानधन दिले जात होते. नंतर ते मानधन वाढून 500रुपये केले. त्यानंतर 1000 रुपये नंतर 1500 आणि शेवटी 2500 रुपये तुटपुंजे मानधन दिले जात आहे.

सम्यक फाऊंडेशन प्रणित श्रमिक मजदुर संघ शालेय पोषण आहार कर्मचारी संघटना यांनी वेळोवेळी मोर्चे, आंदोलन, निवेदन देवून एक लोक चळवळ उभारली आहे. संघटनेच्या वतीने शालेय पोषण आहार कर्मचारी यांना शासकीय सेवेत जो पर्यंत सामावुन घेत नाही तो पर्यंत 15000 रुपये मानधन द्या अशी प्रमुख मागणी केली आहे. हिवाळी आणि पावसाळी अधिवेशनात शिक्षण मंत्री व मुख्यमंत्री यांना भेटून निवेदन देवून मानधन वाढविण्याची मागणी केली होती. ती मागणी काही अंशी मान्य करून एक हजार रुपयाने मानधन वाढीचा निर्णय 5 जुलै 2024 रोजीच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे.

    आपल्या इतर मागण्या जो पर्यंत मान्य होत नाही तो पर्यंत आपला लढा सुरूच राहणार असल्याचे संघटनेचे संस्थापक अध्यक्ष महेंद्र विधाते यांनी सांगितले आहे. या लढ्यात संघटनेचे राज्य समन्वयक सविता विधाते, सुभाष सोनवणे, उत्तम गायकवाड, कैलास पवार,कावेरी साबळे, शितल दळवी तसेच राज्य उपाध्यक्ष कविता धिवारे  तसेच सर्व जिल्हा व तालुका कार्यकारिणी व तमाम सभासद यांनी मोलाची साथ दिली आहे.