आमदार राजळे यांचे मागणीला पालकमंत्र्याचा प्रतिसाद
शेवगांव प्रतिनिधी, दि. १७ : शेवगांव – पाथर्डी तालुक्यात अद्याप पुरेसा पाऊस झालेला नसल्यामुळे मुळा धरणाचे नदीपात्रात सोडण्यात येणारे अतिरिक्त पाणी मुळा उजव्या कालव्याला सोडण्याची आग्रही मागणी आमदार मोनिकाताई राजळे यांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचेकडे केली असता विखे पाटील यांनी सकारात्मक प्रतिसाद देत मुळा पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता सायली पाटील यांना लगेच शेवगाव पाथर्डी तालुक्यासाठी उजव्या कालव्याद्वारे पाणी सोडण्याचे आदेश दिले असुन येत्या दोन दिवसांत पाणी शेतीसाठी उपलब्ध होणार असल्याची माहिती भाजपा प्रदेश किसान मोर्चाचे सदस्य बापुसाहेब पाटेकर यांनी दिली.
शेवगांव व पाथर्डी दोन्ही तालुक्यात आत्तापर्यंत पुरेसा पाऊस झाला नसुन सध्या मुळा धरण्याच्या सांडव्याद्वारे नदी पात्रात अतिरिक्त पाणी सोडण्यात येत आहे. हे अतिरिक्त पाणी कॅनलद्वारे सोडल्यास या भागातील शेतीला फायद्याचे ठरणार आहे. लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांचीही तशी मागणी होत असल्याने आमदार राजळे यांनी पालकमंत्री विखे पाटील यांचेकडे हे अतिरिक्त पाणी कॅनॉल द्वारे सोडण्याची आग्रही मागणी केली.
मुळा धरणाची पाणीसाठा क्षमता ७३६ द.ल.घ.मी. असुन सध्या ६४६ द.ल.घ.मी. इतका पाणीसाठा आहे. सध्या धरणात ८५ टक्के पाणीसाठा झालेला असुन पाण्याची आवक चालुच आहे. कॅनॉलद्वारे पाणी सोडल्यास शेती पिकाला फायदा होऊन काही प्रमाणात पाणीपातळी वाढण्यासही मदत होणार आहे. मंत्री विखे पाटील यांनीही तात्काळ कार्यवाही करत तसे आदेश दिले असुन येत्या दोन दिवसांत कॅनॉल मधून पाणी शेती साठी झेपावणार आहे.
पाटेकर पुढे म्हणाले, आमदार राजळे यांनी पाटपाणी प्रश्नी नेहमी आग्रही भूमिका घेतली असुन लाभधारक शेतक-यांना टेल टु हेड पाणी मिळवुन देण्यासाठी संबधित विभागाला वेळोवेळी सुचना केल्या असुन गेल्या १० वर्षापासून शेतक-यांना पाट पाणी प्रश्न सोडण्यासाठी मदत झाली आहे. २०१० पुर्वी पाट पाण्यासाठी वेळोवेळी आंदोलने करावी लागली असली तरी आ. राजळे यांच्या माध्यमातून २०१४ नंतर शेवगाव पाथर्डी तालुक्यात पुर्ण क्षमतेने पाटपाणी मिळाले आहे.
शासकीय नियमाप्रमाणे जायकवाडी धरण ६५ टक्के भरल्याशिवाय मुळा धरणातून शेतीसाठी आवर्तन सोडता येत नाही तरी सुध्दा आ. राजळे यांनी पाावसाचे कमी प्रमाण व सद्य स्थितीत पिकांना पाण्याची नितांत गरज आसल्याचे लक्षात घेऊन आज पाणी सोडल्यास पिकांना जीवदान मिळणार असल्यामुळे त्वरीत आवर्तन सोडण्याची विनंती करण्यात आली होती, असे पाटेकर म्हणाले.