पालीकेची अतिक्रमण निर्मूलन मोहीम पुन्हा सुरु होणार
कोपरगाव प्रतिनिधी, दि. २४ : कोपरगाव शहरातील मुख्य रस्त्यावरील अतिक्रमणे काढून पालीकेने दोन दिवसांत रस्ते मोकळे केले. त्यानंतर अतिक्रमण निर्मूलन मोहिम शांत झाली असा अंदाज काहींनी बांधला असेल पण तसे नाही. तर यापुढची मोहीम अधीक धक्का देणारी ठरणार आहे. कारण आता दोन दिवसांत काढलेले अतिक्रमण केवळ रस्त्यावरील रहदारीला अडथळा ठरलेल्या छोट्या छोट्या व्यापाऱ्यांचे होते. यामध्ये हातगाड्या, टपऱ्या, गाळे दुकाने, पायऱ्या,ओठे दुकानाचे बोर्ड उध्वस्त झाले.

आता पालीका प्रशासनाची पुढची मोहीम म्हणजे बड्या लोकांनी खडे केलेले अतिक्रमण आडवे करणाऱ्याची तयारी सुरु झाली. शहरातील अनेक मोठमोठ्या इमारती ह्या कागदोपत्री परवानगी पार्कींगसह आहे. माञ प्रत्यक्षात बहुतांश इमारतींना पार्कींग नाही.

ज्यांची पार्कींग आहे त्या ठिकाणी व्यवसायीक दुकाने थाटून नियमांचे उल्लंघन तर केलेच उलट रहदारीला अडथळा निर्माण करण्याचे काम केले आहे. शहरातील मुख्य बाजारपेठेतील रस्त्यावर विविध प्रकारचे वाहने लावून वाहतुकीचा फज्जा उडवला आहे. पार्कींग फक्त कागदावर दिसते प्रत्यक्षात पार्कींग कुठेच दिसत नाही.

शहरातील अनेक उपनगरांमध्ये नकाशावरील रस्त्यासाठी जागा सोडण्याऐवजी रस्त्यावर बांधकाम करुन काहींनी कहर केला आहे. एकाने पुढे बांधकाम केल्याने इतरांनी त्याच प्रमाणे बांधकाम करुन रस्ता नावाला ठेवला आहे अशा सर्व ठिकाणच्या अतिक्रमण केलेल्यांना पालीका प्रशासन येत्या काही दिवसात नोटीसा देणार असुन नोटीसांचा दिलेल्या मुदतीत जर अतिक्रमण काढले नाही तर थेट जेसीबी लावून पक्के बांधकाम भूईसपाट करणार असल्याची माहिती मुख्याधिकारी सुहास जगताप यांनी दिली.

मुख्याधिकारी जगताप पुढे म्हणाले की, अतिक्रमण केलेल्यांनी दिलेल्या वेळेत जर नाही काढले तर अतिक्रमण काढताना जो काही खर्च येईल तो थेट संबंधीत जागा मालकाच्या नावे टाकुन वसुल करणार आहे. प्रामाणिक नागरीकांनी भरलेला कराचा पैसा आता अतिक्रमण काढण्यासाठी वापरणार नसल्याचे सांगितले आहे. एकंदरीत आगामी काळात ज्यांनी ज्यांनी अतिक्रमण वेळेत काढून घेतले नाही तर इमारतीच्या नुकसानी बरोबर अर्थीक नुकसान सोसावे लागणार आहे.

दरम्यान अतिक्रमण मुक्त केलेल्या जागा त्वरीत कामी आणुन शहराचा चेहरामोहरा बदलण्याच्या हालचाली सुरु केल्या आहेत. पुढची अतिक्रमण मोहीम अधिक लक्षवेधी ठरणार आहे. जिल्हाधिकारी हे यावर योग्य तो आराखडा तयार करुन पुढील मोहीमचे नियोजन करणार आहेत.

ज्यांचे अतिक्रमण पहिल्या टप्प्यात काढले आहे त्यांनी पुन्हा अतिक्रमण केले तर त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करणार असल्याचे मुख्याधिकारी जगताप यांनी सांगितले आहे. एकंदरीत आता अतिक्रमण करणाऱ्यांचे व केलेल्यांना पालीका प्रशासन कुठेच वाचण्याची संधी देणार नाही. बेकायदा बांधकाम केलेल्यांचे पालीका प्रशासन येत्या काही दिवसांत उपनगरात जावून मोजमाप करणार आहे. नागरीकांनी जर स्वत: होवून अतिक्रमण काढुन घेतले तर त्यांचे स्वागत करेल पण आमची वाट पहात बसले तर ते संबंधीतांना महागात पडणार हे निश्चित आहे.

अशी माहिती पालीका प्रशासनाने दिल्यामुळे अतिक्रमण करणाऱ्या बड्यांचे धाबे दणाणले आहे. शासकीय जागेतील बेकायदा बांधकाम, आरक्षित जागेवरील बांधकाम, रस्त्यावरील संरक्षण भिंती, गेट, लवकरच नाहीसे करण्याची मोहीम राबवण्याची मोहीम सुरु होतं असल्याने कोपरगाव शहरातील अनेकांची धाकधूक वाढली आहे.

शहरातील अरशी काॅम्पलॅक्सचा चौथा मजला अनाधिकृत बांधल्याने तो अतिक्रमण निर्मूलन पथकाने एका क्षणात पाडला यावरून पालीका प्रशासन किती ठोस भूमिकेत आहे हे सिद्ध झाले. शहरातील इतर इमारतीचे कागदपञ शोधून विनापरवाना बांधकाम लवकरच पाडण्याची शक्यता दाट आहे.