कोपरगाव प्रतिनिधी, दि. १७ : कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव बाजारपेठेला बळकटी मिळण्यासाठी व राहाता व कोपरगाव तालुक्यातील चासनळी पासून कोळपेवाडी, देर्डे , मढी या परिसराचा राहता प्रवरानगर, लोणी या भागाशी दळणवळण सोयीस्कर होण्यासाठी शिवसेनेचे तत्कालीन खा. सदाशिवराव लोखंडे यांच्याकडे पोहेगांव ग्रामपंचायतीच्या माध्यमातून तसेच पंचक्रोशीतील ग्रामस्थांच्या सततच्या मागणीनुसार प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतून डोऱ्हाळे ते कुंभारी हा 11 किलोमीटर लांबीचा रस्ता मंजूर करून घेतला.

मात्र खडकी नदीवरील छोटा पूल वाहतुकीसाठी अडचणीचा ठरत होता. पावसाळ्यात सतत चार महिने पाणी असल्यामुळे हा रस्ता वाहतुकीसाठी बंद रहात होता. या पुलाचेही काम तात्काळ होण्यासाठी खासदार सदाशिव लोखंडे यांच्याकडे मागणी केली असता त्यांनी 1 कोटी 70 लाख रुपये या पुलासाठी मंजूर केले. आता पुलाचे काम पूर्णत्वास आले आहे. मा खा. लोखंडे प्रसिद्धीपासून लांब होते त्यामुळे त्यांनी फीत कापणे व उद्घाटन करणे याचा आग्रह धरला नाही.

डांबरीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर खासदार सदाशिव लोखंडे यांच्या हातुन या पुलाचे लोकार्पण होणार आहे. मात्र त्या अगोदरच नेहमीप्रमाणे काम कोणाचेही असो श्रेय घेण्याचा केविलवाना प्रयत्न आ आशुतोष काळे यांनी केला आहे. आपल्या कार्यकर्त्यांना बरोबर घेत आपणच हे काम पूर्ण केले असल्याचा कांगावा त्यांनी केला. पुलाचे लोकार्पण केवळ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केले असल्याचे शिवसेना जिल्हाप्रमुख नितीनराव औताडे यांनी सांगितले.

प्रसिद्धी पत्रकात त्यांनी म्हटले आहे की, या पुलाचे काम सुरू होत असताना काम चांगल्या दर्जाचे होण्यासाठी संबंधित ठेकेदाराला ही वारंवार सूचना केल्या होत्या. 25 गावांचा दळणवळणाचा प्रश्न असल्याने कामाची क्वालिटी व मजबुतीकडे स्थानिक पोहेगांवचे प्रशासन लक्ष देऊन होते. प्रतिकूल परिस्थितीत पोहेगाव ग्रामपंचायतच्या माध्यमातून या छोट्या पुलावर जेव्हा पाणी येईल तेव्हा नळ्या टाकुन मुरूम माती टाकून काम तात्पुरत्या स्वरूपात केले जायचे. तेव्हा आता श्रेय घेत असलेले लोकप्रतिनिधी कुठे असायचे असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

अतिवृष्टीमुळे शेतकरी अडचणीत आला. शेतकऱ्यांना भरीव मदत देण्यासाठी आपण काय केले. संपूर्ण परिसरात सोयाबीनचे क्षेत्र बागायती असताना जिरायती दाखवण्यात आले याला जबाबदार कोण आहे. शेतकऱ्यांना अजून कुठलीच मदत मिळाली नाही आणी आपण न केलेल्या कामाचे लोकार्पण करत आहात ही बाब अत्यंत दुर्देवी आहे.

तालुक्यातील जनतेचे अनेक प्रश्न प्रलंबित आहे. वीज पाणी व दळणवळणाच्या प्रश्नावर तालुका त्रस्त आहे. हे प्रश्न सोडवण्यासाठी आपण काळजी घ्यावी. तोंडावर आलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून पोहेगाव येथील खडकी नदीवरील पुलाचे लोकार्पण करून परिसरातील जनतेची दिशाभूल करत असल्याचे शेवटी नितीनराव औताडे यांनी सांगितले.


