कोपरगाव प्रतिनिधी, दि. १७ : कोपरगाव शहरासह मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी आणि मूलभूत समस्यांवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी व्हिजन कोपरगाव मंचच्या पुढाकाराने ‘संवादातून सुविधेकडे’ या विशेष संवाद कार्यक्रमाचे आयोजन रविवारी १६ ऑगस्ट रोजी कोपरगाव शहरातील कृष्णाई बँक्वेट हॉल येथे करण्यात आले होते. शहरातील सुशिक्षित वर्ग, उद्योजक, डॉक्टर, वकील, इंजिनिअर आणि व्यापाऱ्यांनी या बैठकीला मोठ्या संख्येने उपस्थित राहून कोपरगावच्या प्रगतीसाठी महत्त्वपूर्ण सूचना मांडल्या. विजन कोपरगावच्या या संवाद कार्यक्रमात विधान परिषदेचे आमदार विवेक कोल्हे यांचा सत्कार करण्यात आला तसेच या कार्यक्रमाला कोपरगावचे नगराध्यक्ष पराग यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

पहिल्या सत्रात बाजारपेठेवर चर्चा झाली त्यात अशोक कोठारी संजय बंब, संजय भन्साळी, सुधीर डागा,नितीन भुसारे,दीपक विसपुते यांनी तज्ञ म्हणून आपले विचार मांडले. दुसऱ्या सत्रात पायाभूत सुविधांवर प्रकाश टाकण्यात आला या चर्चेसाठी डॉ.डी.एस. मुळे,राजेश ठोळे, डॉ.राजेंद्र श्रीमाळी, प्रसाद नाईक, संतोष भट्टड, प्रा.रियाज शेख, प्रा. वृंदा कोऱ्हाळकर यांनी संवाद साधला.

या बैठकीत उपस्थित मान्यवरांनी शहरातील दैनंदिन अडचणी आणि बाजारपेठेच्या सद्यस्थितीवर सविस्तर चर्चा केली, बाजारपेठेतील वाहतूक कोंडी रोखण्यासाठी पार्किंग व्यवस्थेचे नियोजन करणे, मुख्य रस्त्यांचे रुंदीकरण, खड्डे मुक्त रस्ते, मोकाट जनावरांचा प्रश्न मार्गी लावणे, रस्ते बांधकाम करताना प्रॉपर ट्रीटमेंटने रस्ते बनवावे, विकास कामे करताना चांगल्या दर्जाचे करावे, कोपरगावात बाजारपेठ हलवण्यासाठी नवनवीन उद्योगांना चालना द्यावी, युवा व्यापाऱ्यांसाठी मार्गदर्शन शिबिरांचे आयोजन करावे, पर्यटनासाठी सुविधा उपलब्ध कराव्यात अशा अनेक गोष्टींवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

पिण्याच्या पाण्याचा नियमित पुरवठा, ड्रेनेज लाईनची दुरुस्ती आणि स्वच्छता व्यवस्था अधिक सक्षम करण्याची मागणी डॉक्टर्स व अभियंत्यांनी केली. स्थानिक उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि नवीन व्यवसायांना चालना देण्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा पुरवण्याचे आवाहन व्यापाऱ्यांनी केले.

संवाद कार्यक्रमादरम्यान बोलताना आमदार विवेक कोल्हे म्हणाले, “कोपरगाव शहराला सुसज्ज आणि आधुनिक बनवण्यासाठी प्रत्येक घटकाचे योगदान महत्त्वाचे आहे. नागरिकांनी मांडलेले प्रश्न केवळ कागदावर न राहता, त्यावर टप्प्याटप्प्याने ठोस उपाययोजना केल्या जातील यासाठी ही चर्चा महत्वाची ठरणार आहे. तसेच चार महिन्यानंतर डिसेंबर महिन्यात पुन्हा एकदा अशा पद्धतीने संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्याचे आवाहन देखील विवेक कोल्हे यांनी आयोजकांना केले.

नगराध्यक्ष पराग संधान यांनीही नगरपरिषदेच्या वतीने शहरातील सर्व प्रलंबित कामे वेळेत पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. काही काळ रस्त्यांची कामे विलंब होतील कारण भूमिगत गटारीची कामे सुरू आहे त्यामुळे पुन्हा रस्ता खोदावा लागू नये यासाठी उशीर होतो आहे. मोकाट जनावरांसाठी नगरपरिषद गोशाळा उभारत असून हा प्रश्न देखील आता सुटण्याच्या उंबरठ्यावर आला आहे.या उपक्रमामुळे नागरिक आणि लोकप्रतिनिधींमधील दुवा अधिक घट्ट झाला असून, कोपरगावच्या विकासाला नवी दिशा मिळेल असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.


