शेवगाव प्रतिनिधी, दि. २३ : सध्या होत असलेल्या पावसाने तालुक्यातील नवीन दहिफळ ते शिंदे वस्ती या रस्त्याची अत्यंत दूर्दशा केली आहे. या रस्त्याने वस्ती परीसरातून रोज गावात शाळेसाठी जाणारी बाल शाळकरी मुले अक्षरश: रडकुंडीला येतात. अनेकदा या रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी करूनही ती झाली नाही. गेल्या दोन वर्षापासून या रस्त्याचा प्रश्न प्रलंबित आहे.
शाळेत जाणाऱ्या चिमुकल्यांना मोठी कसरत करत शाळेत जावे लागते. या दिवसात धडधाकट माणसाला देखील या रस्त्याने चालणे मुश्किल होते. एवढ्या मोठ्या प्रमाणात येथे चिखलाची चिडचिड असते, या वस्तीवर प्राथमिक शाळेची सोय नसल्याने लहान मुलांना शिक्षणासाठी हे किमान एक किलोमीटरचे अंतर रोज चिखल तुडवत जाण्याची पाळी आली आहे. गेल्या कित्येक दिवसापासून हे हाल होत आहेत.
ग्रामस्थांनी वेळोवेळी रस्त्याची मागणी केली आहे. हा परिसर काळवटीचा असल्याने पाऊस झाला की लगेच चिखलाने माखतो. अधूनमधून पडलेल्या खड्ड्यात गाळमिश्रित पाण्याची डबकी साचतात. नवीन दहिफळ ते शिंदे वस्ती रस्ता मंजूर व्हावा याकरिता ग्रामपंचायतीने अनेक वेळा ठराव करून जिल्हा परिषद अध्यक्ष, आमदार, खासदार यांना दिले आहेत. मात्र ग्रामस्थांच्या या मागणीकडे कुणीही गांभीर्याने लक्ष घातले नाही. अशी ग्रामस्थांची तक्रार आहे.