नवोदित कवी मराठी भाषा जतन संवर्धन करतील – माजी नगराध्यक्ष कुदळे 

कोपरगाव प्रतिनिधी, दि. २८ : कवी कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आयोजित केलेल्या या कविता वाचन समारंभातून जाणवते की, आजचे नवोदित कवी मराठी भाषा जतन संवर्धन करतील, शब्दगंध साहित्यिक परिषदेच्या या उपक्रमातून नवोदितांना संधी उपलब्ध करून दिली यातूनच पुढे मोठे साहित्यिक ऊभे राहतील, असा आशावाद माजी नगराध्यक्ष पदमकांत कुदळे यांनी व्यक्त केला.

     शब्दगंध साहित्यिक परिषद महाराष्ट्र राज्य कोपरगाव शाखेच्या वतीने कवी कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात आला. समारंभाच्या अध्यक्षस्थानी माजी नगराध्यक्ष पदमकांत कुदळे, प्रमुख पाहुणे म्हणून श्रीमान गोकुळचंदजी विद्यालयाचे सेवानिवृत्त शिक्षक सुरेश गोरे हे होते. 

उपस्थित मान्यवरांचे हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले स्वागत व प्रास्ताविक श्रीमती स्वाती ताई मुळे यांनी केले शब्दगंध साहित्यिक परिषद कोपरगाव शाखेच्या अध्यक्षा ऐश्वर्यलक्षमी सातभाई यांनी शाखेच्या उपक्रमांची माहिती देऊन कविता वाचन समारंभास शुभारंभ केला.  

या कविता वाचन समारंभात महाविद्यालयातील विद्यार्थी, विद्यार्थीनींनी, शहरातील कवयित्रींनी सहभाग घेतला. यावेळी विधिज्ञ श्रद्धा जवाद, कवी सुधीर कोयटे यांनी मनोगत व्यक्त केले. उपस्थित मान्यवरांचे हस्ते सहभागी कविंना सन्मानपत्र, कवी कैलास साळगट लिखित ग्रंथ, स्व.र.म. परिख हिंदी व मराठी ग्रंथालय वाचनालयाच्या वतीने लेखनी भेट देऊन सन्मानित केले. 

कविता वाचन समारंभासाठी के.जे. सोमैया महाविद्यालयातील मराठी विभाग प्रमुख, प्रा. रावसाहेब गायकवाड, जेष्ठ नागरिक सेवा मंचच्या माधवी, लायन्स क्लबच्या माजी अध्यक्षा पटवर्धन, सुनयना केळकर, वंदना चिकटे, प्रा. डॉ संजय दवंगे, हेमचंद्र भवर, प्रमोद येवले, कवी बाळासाहेब देवकर, दिपक त्रिभुवन, ग्रंथपाल योगेश कोळगे, विधिज्ञ शितल देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते.

याप्रसंगी बालगायिका समृद्धी दिपक त्रिभुवन हिने मराठी भाषेचा महिमा व्यक्त करणारे गित गाऊन उपस्थितांची मने जिंकली. कवी कैलास साळगट यांनी सुत्रसंचलन केले तर शैलजा रोहोम यांनी आभार प्रदर्शन केले. मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आयोजित समारंभ यशस्वी होण्यासाठी सर्व सभासदांनी सहकार्य केले.

Leave a Reply