कोपरगावला कायमस्वरूपी वनपरिक्षेत्र अधिकाऱ्याची नेमणूक – आमदार काळे

कोपरगाव प्रतिनिधी, दि. ११ : राज्यासह कोपरगाव मतदार संघात गेल्या काही महिन्यांपासून बिबट्यांच्या वाढत्या हल्ल्यांमुळे नागरिकांमध्ये तीव्र भीतीचे वातावरण निर्माण होवून दोन निरपराध बळी गेले आहे. त्या पार्श्वभूमीवर बिबट्याच्या होणाऱ्या हल्ल्यांपासून नागरीकांच्या व पाळीव जनावरांच्या संरक्षणासाठी आ. आशुतोष काळे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे स्वतंत्र व पूर्णवेळ वनपरिक्षेत्र अधिकारी (RFO) नियुक्त करण्याची मागणी केली होती. त्या मागणीची दखल घेवून महायुती शासनाने कोपरगावला कायमस्वरूपी वनपरिक्षेत्र अधिकारी नेमणूक केली असल्याचे आ.आशुतोष काळे यांनी सांगितले आहे.  

कोपरगाव मतदार संघात बिबट्यांच्या हल्ल्यात एक महिला व एक मुलगी ठार झाली त्यावेळी संतप्त ग्रामस्थांनी रास्तारोको आंदोलन केले होते. त्यावेळी घटनास्थळावरूनच आ.आशुतोष काळे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी दूरध्वनी वरुन संपर्क करून घटनेची माहिती देत बिबट्याचे हल्ले रोखण्यासाठी तातडीने उपाय योजना करण्याची मागणी केली होती. यानंतर नरभक्षक बिबट्याला ठार मारण्याचा आदेश शासनाकडून वनखात्याला प्राप्त होवून त्या नरभक्षक बिबट्याला ठार करण्यात आले होते. परंतु बिबट्यांची संख्या मोठी असल्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र भीतीचे वातावरण निर्माण आहे.

या विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन आ.आशुतोष काळे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पाठपुरावा करून तातडीने रिक्त असलेल्या कोपरगाव वनपरिक्षेत्र अधिकारी पदावर तातडीने अधिकाऱ्याची नेमणूक करण्याची मागणी करून त्याबाबत लेखी निवेदन दिले होते. नागरिकांच्या सुरक्षेशी संबंधित हा महत्त्वाचा विषय लक्षात घेऊन कोपरगावला कायमस्वरूपी वनपरिक्षेत्र अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात आली आहे.

या निर्णयाचे स्वागत करत आ.आशुतोष काळे यांनी सांगितले की, कोपरगाव तालुक्यात बिबट्यांच्या वाढलेल्या हालचालींमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होते. त्यामुळे वनपरिक्षेत्र अधिकाऱ्याची तातडीने नेमणूक होणे अत्यंत गरजेचे होते. नवीन वनअधिकाऱ्यांच्या नियुक्तीमुळे वन विभागाच्या कामकाजाला गती मिळेल आणि नागरिकांची बिबट्यापासून सुरक्षा करण्यासाठी आवश्यक उपाय अधिक सक्षमपणे राबवता येतील. वन्यजीव व्यवस्थापन, विशेषतः बिबट्यांच्या वाढत्या संचारावर नियंत्रण, निरीक्षण आणि आवश्यक उपाययोजना अधिक प्रभावीपणे राबवता येतील.

वनपरिक्षेत्र अधिकारी नियुक्त झाल्याने वन विभागाला आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध झाले असून गस्त वाढवणे, संवेदनशील क्षेत्रांचे सर्वेक्षण, तसेच जनजागृती मोहिमा राबवण्यास गती मिळणार आहे. बिबट्यांच्या हालचाली ओळखण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर वाढवणे आणि नागरिकांना सुरक्षित वावरण्यासाठी मार्गदर्शन करणे या उपक्रमांनाही चालना मिळेल असा विश्वास व्यक्त करून आ.आशुतोष काळे यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व वनमंत्री गणेश नाईक यांचे आभार मानले आहे.

Leave a Reply