कांद्याचे निर्यात शुल्क रद्द करा, अन्यथा तीव्र आंदोलनाचा ईशारा

शेवगाव प्रतिनिधी, दि. २१ : कांद्याचे निर्यात शुल्क रद्द करण्याच्या मागणीच्या पाठपुराव्यासाठी येथील स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या समवेत सोमवारी बाजार समितीच्या कांदा मार्केटमध्ये केंद्र सरकारच्या जाचक निर्णयाच्या प्रतिकात्मक आदेशाची होळी करून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळण्यासाठी तालुक्यातील कांदा खरेदीदारांनी कांद्याचे लिलाव बेमुदत बंद करण्याच्या मागणीचे निवेदन खरेदीदार व्यापाऱ्यांना दिले. सकारात्मक निर्णय न झाल्यास उग्र आंदोलनाचा निर्णय घेण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे

यावेळी कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी केंद्र सरकारच्या विरोधात केलेल्या प्रचंड घोषणाबाजीमुळे परिसर दणाणून गेला शेवगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणात कांद्याचे उत्पादन झाले आहे, एप्रिल महिन्यात तालुक्याच्या काही भागात झालेली अतिवृष्टी व गारपीट त्यानंतर यंदाच्या पावसाळ्यात तालुक्यात कमी प्रमाणात झालेला पाऊस त्यामुळे कांद्याची मागणी वाढली. काही प्रमाणात चांगला भाव मिळून त्याचा लाभ मिळत असताना केंद्र सरकारने निर्यात शुल्क वाढवल्याने त्याचा फटका थेट कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसण्यास सुरुवात झाली आहे.

परिणामी कांद्याचे भाव कोसळले, कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात खर्च करून कांद्याची लागवड केली त्याची योग्य निगा ठेवली. मात्र ऐन वेळेस भाव कमी झाल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना विविध समस्यांचा सामना करण्याची वेळ आली आहे. नाशिकसह अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी घोडेगाव आदी कांद्याच्या बाजारात बाजार समित्यांनी कांदा खरेदी-विक्री बंद आंदोलन पुकारले आहे.

त्याच धर्तीवर शेवगाव बाजार समितीच्या प्रांगणातील कांदा खरेदीदार व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या बाजूने ठामपणाने उभे राहून कांदा खरेदी-विक्री बंद ठेवावी अशी मागणी करणारे निवेदन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी व तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या वतीने बाजार समितीकडे देण्यात आले.

शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष दत्तात्रय फुंदे यांच्या नेतृत्वाखाली पुकारलेल्या आंदोलनात तालुक्यातील संतोष गायकवाड, बाळासाहेब तेलोरे, संतोष घाडगे, अक्षय लेंडाळ, मधुकर पाटेकर, कांदा खरेदीदार व्यापारी संघटनेचे बापूसाहेब गवळी, गणेश बोरा, राजेंद्र आवटी यांच्यासह कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले. बाजार समितीचे सचिव अविनाश म्हस्के यांनी निवेदन स्वीकारले.

व्यापारी संघटनेचे गवळी म्हणाले, कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या मागणीबाबत व्यापारी संघटना सहमत असून इतर ठिकाणच्या बाजार समितीकडून माहिती घेऊन बाजार समितीच्या प्रांगणात होणाऱ्या कांदा खरेदी-विक्री बाबत शेतकऱ्यांच्या बाजूने योग्य तो निर्णय घेण्यात येईल.