आरक्षण मिळेपर्यंत पुढाऱ्यांना गावात ‘नो एन्ट्री’

शेवगाव प्रतिनिधी, दि. २१ : शेवगाव तालुक्यातील भावीनिमगाव, मठाचीवाडी, मजले शहर आदि अनेक गावात सकल मराठा समाजाच्या वतीने सर्वपक्षीय राजकीय पुढाऱ्यांना गावबंदी करण्यात आली असून गावाच्या वेशीवर तशा आशयाचे फलक लावण्यात आले आहेत. मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत सर्व पक्षाच्या नेत्यांना गावात येऊ देणार नाही, अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे.

चुलीत गेले नेते, चुलीत गेला पक्ष; मराठा आरक्षण हेच आमच लक्ष्य असा मजकूर फलकावर आहे. या संदर्भात नंदकुमार शेळके म्हणाले, प्रस्थापित राज्यकर्ते हे मराठ्यांची उघड बाजू कधीच घेताना दिसले नाहीत आणि अजूनही ते पुढे येत नाहीत. त्यांना मताची भीती वाटते म्हणून ते आपल्या बाजूने येत नाहीत.

राजकीयदृष्ट्या मराठे जागे असतात. पण त्यांना मतदार म्हणून देखील जागे होणे गरजेचे आहे. नवा राजकीय पर्याय येथील सकल मराठा समाजाने सर्व आजी-माजी राजकीय पुढाऱ्यांना गावबंदी करून जिल्ह्यात सर्व प्रथम पुढाकार घेतला आहे. गुरुवार (दि.१९ ) पासून येथील गावबंदीचे फलक माध्यमावर व्हायरल होत आहेत.