आंतर विभागीय संशोधनात्मक परीषदांची गरज – डॉ. रजनीश कामत

कोपरगाव प्रतिनीधी, दि.०२ : आधुनिक तंत्रज्ञानानुसार प्रत्येक अभियांत्रिकी शाखेची दुसऱ्या अभियांत्रिकी शाखेच्या संशोधनात/उत्पादनात महत्वपुर्ण सहभाग असतो. १९९६ पर्यंत इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकी शाखेची स्वतंत्र ओळख होती. परंतु आता इलेक्ट्रॉनिक्स, कॉम्प्युटर, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इत्यादी अभियांत्रिकी शाखांचा एकमेकांच्या उत्पादनात अंतर्भाव आहे. या अनुषंगाने संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयाने तीन विभाग मिळुन संशोधनावर आंतरराष्ट्रीय परीषद घेवुन परस्परांच्या संकल्पना खुल्या करण्याचा प्रयत्न केला, ही बाब अतिशय स्तुत्य आहे, असे प्रतिपादन डॉ. होमी भाभा स्टेट युनिव्हर्सिटी, मुंबईचे कुलगुरू डॉ. रजनिश कामत यांनी केले.

संजीवनी इंजिनिअरीग कॉलेजच्या रिसर्च अँड डेव्हलपमेंट सेलच्या पुढाकराने कॉम्प्युटर इजिनिअरींग, इलेक्ट्रॉनिक्स अँड कॉम्प्युटर इंजिनिअरींग व इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी विभागाने संयुक्तिक रित्या आयोजीत केलेल्या ‘इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन रिसेंट ट्रेंड्स इन कॉम्प्युटींग’ या विषयावरील परीषदेच्या उद्घाटन प्रसंगी डॉ. कामत प्रमुख पाहुणे म्हणुन बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे  मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे, तामिळनाडू टिचर्स एज्युकेशन युनिव्हर्सिटी, तामिळनाडूचे माजी कुलगुरू डॉ. एन. पंचनाथन, भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्त्रो) उपग्रह केंद्राचे माजी समुह संचालक नितिन घाटपांडे, श्रीनिधी शैक्षणिक समुह, हैद्राबादचे चिफ हुमन रिसोर्सेस ऑफिसर आशिष मित्तल, डायरेक्टर डॉ. ए. जी. ठाकुर, विभाग प्रमुख डॉ. डी. बी. क्षिरसागर, डॉ. बी.एस. आगरकर, डॉ. माधुरी जावळे, डीन-आर अँड  डी. डॉ. पी. विल्यम उपस्थित होते.

संशोधनाच्या क्षेत्रात उल्लेखनीय योगदान म्हणुन २८० शोधनिबंधांपैकी ९० शोधनिबंध स्कोपसने अनुक्रित केलेल्या कॉन्फरन्स प्रोसिडिंग्जमध्ये प्रकाशनासाठी निवडले आहेत. डॉ. कामत पुढे म्हणाले की सॉफ्टवेअर क्षेत्रात भारत सुपर पॉवर आहे. त्यामुळे हार्डवेअर आणि सॉफ्टवेअरच्या मदतीने उत्तम संगणकियकरण (कॉम्प्युटींग) होवु शकते. आपली लोकसंख्या चीनच्याही पुढे गेली आहे. आपल्या तरूणपिढीची संख्याही जास्त आहे, परंतु संशोधनात्मक उपलब्धी कमी आहे. यासाठी एकमेकांच्या सहयोगाने कार्य होणे गरजेचे आहे.

अमित कोल्हे म्हणाले की इतर देशांच्या तुलनेत भारतात संशोधनला कमी निधी मिळतो. देशाचे प्रंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘विकसित भारत युवकांचा आवाज’ ही संकल्पना नुकतीच लॉन्च केली. या दृष्टीने युवकांनी संशोधन कार्यात झोकुन देणे गरजेचे आहे. डॉ. ए. पंचनाथन म्हणाले की, शोधनिबंध जरी कमी सादर केले तरी चालेल परंतु ते असे निवडा की त्यांचा उत्तम दर्जा असला पाहीजे. त्यामुळे आपली ओळख सर्वदुर पोहचेल आणि आपला सन्मान होईल.

घाटपांडे म्हणाले की, वेगवेगळे यान लॉंन्च करताना अथवा ते अवकाशात असतील त्यावेळेस त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी कॉम्प्युटींगचा अतिशय उपयोग होतो. चंद्रयान 3 या इस्त्रोच्या प्रोजेक्टमध्येही कॉम्प्युटिंग कसा उपयोग झाला, हे त्यांनी विषद केले. मित्तल म्हणाले की, सध्याच्या र्टिफिशियल इंटिलिजन्स नंतर आर्टिफिशीयल जनरल इंटिलिजन्स येवु घातले आहे. त्यामुळे २०३० च्या दरम्यान डीजिटल जग आपणास पहायला मिळेल, व त्यानुसार आपण बदलले पाहीजे. कारण या काळात ७५ टक्के मनुष्य  बळाला पुन्हा आपापल्या क्षेत्रातील प्रशिक्षण घेण्याची गरज पडू शकते.

सदर प्रसंगी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मार्केटींग मॅनेजमेंटच्या अभ्यासमंडळाचे चेअरमन व संजीवनी इन्स्टिटयूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीजचे डायरेक्टर डॉ. विनोद मालकर यांनी लिहिलेल्या ‘बेसिक्स ऑफ मार्केटींग’ या पुस्तकाचेही मान्यवरांचे हस्ते प्रकाशन झाले. हे पुस्तक एमबीए, बीबीए व बी. कॉमच्या विध्यार्थ्यांसाठी उपयुक्त ठरणार आहे.