दुष्काळी गावांना त्वरित पाण्याचे टँकर सुरू करा – डॉ. क्षितिज घुले

शेवगाव प्रतिनिधी, दि.१३ : तालुक्याच्या पूर्व भागातील अनेक गावात उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच पिण्याच्या पाण्याची टंचाई भासू लागली असून नागरिकांची पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती सुरु झाली आहे. पूर्व भागातील दुष्काळी गावाना मागणी होईल त्या गावांना त्वरित टँकर सुरू करण्यात यावा अशी मागणी माजी सभापती डॉ. क्षितिज घुले यांनी तहसीलदार प्रशांत सांगङे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.

निवेदनात म्हटले आहे की, तालुक्यातील पूर्व भागामध्ये सातत्याने दुष्काळी परिस्थिती असल्यामुळे या गावामध्ये सध्या कुठल्याही प्रकारचे पाण्याचे स्तोत्र उपलब्ध नाहीत. त्यामुळे पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. तालुक्यातील बेलगाव अंतरवाली बुद्रुक, अंतरवाली खुर्द मंगरूळ, खुर्द मंगरूळ बुद्रुक, कोळगाव, राणेगाव, शिंगोरी, नागलवाडी, लाडजळगाव, दिवटे बाङगव्हाण, शेकटे बुद्रुक, शेकटे खुर्द, सुकळी चेडे, चांदगाव, सुळेपिंपळगाव, चापडगाव, वरखेड, सोनेसांगवी आदि गावामध्ये दुष्काळी परिस्थिती भेडसावू लागली आहे.

या गावात लोकांना व जनावरांना पिण्याच्या पाण्याच्या अडचणी निर्माण झाल्या आहेत. परिसरातील गावाना अधिकाऱ्यांनी भेटी देऊन पाण्याच्या संदर्भातील नागरिकांच्या व्यथा समजून घ्याव्यात. आणि या गावामध्ये त्वरित टँकरने पाणीपुरवठा सुरू करून नागरिकांच्या अडचणी दूर कराव्यात. अशी मागणी करण्यात आली आहे.

यावेळी त्यांचे समवेत बाजार समितीचे सभापती एकनाथ कसाळ, ज्ञानदेव घोरतळे, हनुमान पातकळ, संदीप मोटकर, मार्तंड आंधळे, दत्तात्रय फुंदे, नारायण सातपुते, शंकर गोबरे, विठ्ठल चेङे, परमेश्वर तेलोरे, आनिस सय्यद आदी उपस्थित होते.