आपणच आपल्या जीवनाचे शिल्पकार – कमलाकर टाक

कोपरगाव प्रतिनिधी, दि.१८ : स्वतः मधील क्षमता ओळखा. प्रत्येकाकडे ज्ञान असतेच परंतु शहाणपण असेलच असे नाही. ध्येयाकडे जात असताना अडथळे येतील, त्यांना सकारात्मक माणुन त्यातुन शिकवण घ्या. कॉलेज हे परीवर्तनशिल  जीवन शिकविते. जगण्याचे खरे युध्द  ठराविक शिक्षण  पुर्ण झाल्यावर सुरू होते. सध्याच्या काळात अनेक संधी आहेत. प्रत्येक संधी प्राप्त करण्यासाठी यशस्वीपणे येणारे विविध टप्पे पार करा, कारण आपणच आपल्या जीवनाचे शिल्पकार आहात, असे प्रतिपादन किंग प्लस लिमिटेडचे चिफ आपरेशन्स ऑफीसर कमलाकर टाक यांनी केले.

संजीवनी के.बी.पी. पॉलीटेक्निकने इंडियन सोसायटी फॉर टेक्निकल एज्युकेशन व इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनिअर्सच्या स्टुडन्टस् चाप्टर्स अंतर्गत व रोटरी क्लब कोपरगांच्या सहकार्याने ‘संजीवनी टेक-मंत्रा २ के २४’ या राष्ट्रीय पातळीवरील तांत्रिक स्पर्धांचे आयोजन केले होते. या स्पर्धांच्या उद्घाटन प्रसंगी श्री टाक प्रमुख पाहुणे म्हणुन बोलत होते. संजीवनी ग्रुप ऑफ स्कूल्सच्या संचालिका डॉ. मनाली कोल्हे यांनी या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भुषविले.

यावेळी व्यासपीठावर महाराष्ट्र  जीवन प्राधिकरण, महाराष्ट्र  राज्याचे कार्यकारी अभियंता व संजीवनी इंजिनिअरींग कॉलेजचे माजी विध्यार्थी श्री सुबोध मोरे, संजीवनी इंजिनिअरींग कॉलेजचे डायरेक्टर डॉ. ए. जी. ठाकुर, प्राचार्य ए. आर. मिरीकर, समन्वयक प्रा. डी. ए. पाटील, सहसमन्वयक प्रा. जी. एस. चांगण, विभाग प्रमुख व डीन्स उपस्थित होते. देशभरातील विविध पॉलीटेक्निक्स मधिल ७०० पेक्षा अधिक स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभाग नोंदविला.

प्रारंभी प्राचार्य मिरीकर यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत करून संजीवनी अंतर्गत विविध संस्थांची उपलब्धींबाबत सांगीतले. यावेळी ते म्हणाले की संस्थेचे अध्यक्ष नितीन काल्हे व मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली संजीवनीच्या सर्वच संस्था वेगवेगळ्या पातळीवर नवनवीन कीर्तिमान स्थापित करीत आहेत.

टाक पुढे म्हणाले की, आपल्याला काय बनायचे आहे, ते ठरवा. त्यासाठी कोणत्या कौशल्यांची गरज लागते ते स्वतःमध्ये विकसीत करा. नेहमी ज्ञानाची भुक ठेवा. मोरे म्हणाले की, संजीवनी संस्था ही जरी ग्रामिण भागात असली तरी येथे सर्व काही उपलब्ध आहे आणि येथुन चांगले नागरीक घडतात. या स्पर्धेत अंतर्भाव केलेले विषय  हे उद्योग जगताला अभिप्रेत आहे. म्हणुन विध्यार्थ्यांनी आपापल्या शाखेनुसार केवळ स्पर्धे पुरतेच नव्हे तर जीवनात पुढे जाण्यासाठी त्या विषयांचा अभ्यास करावा. संकल्पना आणि कौशल्य संच या दोन पंखांचा वापर करून जीवनात उंच भरारी शक्य आहे, असे श्री मोरे यांनी शेवटी म्हटले.

अध्यक्ष स्थानावरून बोलताना डॉ. कोल्हे म्हणाल्या की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेनुसार २०४७ साली देशाला सुपर पावरच्या दृष्टीने वाटचाल करायची आहे. यासाठी युवकांचे योगदान महत्वाचे आहे. कारण भारत हा ६६ टक्के युवकांचा देश  आहे. कोणत्याही स्पर्धेतुन आपण कोठे आहोत याचे आकलन होते. तेव्हा काय बरोबर आहे व काय चुकलं, हे शोध. यषस्वी होण्यासाठी कठीण परीश्रमाला पर्याय नाही, असे डॉ. कोल्हे शेवटी म्हणाल्या.

या स्पर्धामंध्ये प्रत्येक विषय गटात प्रथम विजेत्यास रू ७००१, द्वीतिय विजेत्यास रू ५००१ व उत्तेजनार्थ विजेत्यास २००१ चे रोख बक्षिस तसेच प्रमाणपत्र देण्यात आले. टेकब्लिट्झ हॅकॅथॉन या स्पर्धेत एमआयटी पॉलीटेक्निक, छ. संभाजीनगरने प्रथम, गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक, अ.नगर ने द्वीतिय व संजीवनी पॉलीटेक्निकने उत्तेजनार्थ बक्षिस जिंकले. पोस्टर प्रेझेंटेशन स्पर्धेत वामनराव इथापे पॉलीटेक्निकने प्रथम व संदीप पॉलीटेक्निक, नासिकने दुसरे बक्षिस जिंकले.

पेपर प्रेझेंटेशन (सर्किट ग्रुप) मध्ये एसएचएचजेबी पॉलीटेक्निक, चांदवडने प्रथम, संजीवनी पॉलीटेक्निकने दुसरे व अमृतवाहिनी पॉलीटेक्निक, संगमनेरने उत्तेजनार्थ बक्षीस जिंकले. तर नॉन सर्किट गटात संदीप पॉलीटेक्निकने प्रथम व  एसएचएचजेबी पॉलीटेक्निकने दुसरे बक्षीस जिंकले. ब्रिज मेकिंग स्पर्धेत गव्हर्नमेंट पॉलीटेक्निक, छ. संभाजीनगरने प्रथम व संजीवनी पॉलीटेक्निकने दुसरे बक्षिस जिंकले.

प्रोजेक्ट स्पर्धेत ग्रुप ए गटात एसएचएचजेबी पॉलीटेक्निकने प्रथम, गव्हर्नमेंट पॉलीटेक्निक, नांदेडने दुसरे आणि के.के.वाघ पॉलीटेक्निक, नाशिक व एमआयटी पॉलीटेक्निक, येवलाने उत्तेजनार्थ बक्षिसे जिंकली. ग्रुप बी गटात एसएचएचजेबी पॉलीटेक्निकने प्रथम, संजीवनी पॉलीटेक्निकने दुसरे आणि गव्हर्नमेंट पॉलीटेक्निक, नगर व अवसारीने उत्तेजनार्थ बक्षिसे जिंकली.