उन्हाळी आवर्तनातून पाणवठे भरून द्यावेत – चंद्रशेखर घुले

शेवगाव प्रतिनिधी, दि. ११ : मुळा उजवा कालव्याचे शेतीसाठी उन्हाळी आवर्तन चालू झाले आहे. या आवर्तनामध्ये जेथे जेथे शक्य असेल तेथील पाणवठे पाण्याने भरून द्यावेत, म्हणजे लाभ क्षेत्रातील पिण्याच्या पाण्याचा तसेच जनावरांच्या चाऱ्या पाण्याचा प्रश्न सुकर होईल. काही प्रमाणात चाराही उपलब्ध होईल व या भागात शेवटच्या टप्प्यात पिण्यासाठी टँकरने पाणीपुरवठा करण्याची गरज भासणार नाही.

यासाठी शेवगाव पाथर्डी तालुक्यातील लाभ क्षेत्रातील पिण्याचे पाण्याचे स्रोत भरण्यास तात्काळ परवानगी द्यावी. अशी मागणी माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील यांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ व कार्यकारी अभियंता सायली पाटील यांचेकडे निवेदन देऊन केली आहे.

यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष (अजित पवार गट ) संजय कोळगे, कृ. उ.बाजार समितीचे उपसभापती गणेश खंबरे, पसचे माजी उपसभापती अंबादास कळमकर, माणिक बुधवंत, डॉ. सुधाकर लांडे,राजेंद्र आढाव, अशोकराव मेरड,राहुल बेडके,राजेंद्र देशमुख,विक्रम लोढे, उदय बुधवंत,संजय बुधवंत आनंद सावंत . जगन्नाथ साबळे .शहादेव खोसे,बबनराव जाधव,कांताशेठ निकम,लक्ष्मणराव नांगरे, गंगाधर शेळके तुकाराम मुळे संजय मराठे गहिनीनाथ टेमकर यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शेतकरी आधीच आर्थिक अडचणीतून जात असल्याने शेतीला पूरक असलेल्या पशुधन वाचवण्याचे आव्हान शेतकऱ्यांसमोर आहे. त्यासाठी पाणीटंचाई सारखे महाकाय संकट शेतकऱ्यासमोर आहे. त्यामुळे चालू आवर्तनात शेवगाव -पाथर्डी तालुक्यातील टेलच्या भागापर्यंत उपलब्ध पिण्याच्या पाण्याचे स्रोत चालू असलेल्या आवर्तनातून भरल्यास या भागातील पिण्याच्या पाण्यासह शेतीला पूरक असणाऱ्या पशुधनचाऱ्यासाठी मोठी मदत होईल. – संजय कोळगे
– जिल्हा कार्याध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस

       शेवगाव तालुक्यातील भायगाव येथे असणारा तलाव चालू आवर्तनातून भरल्यास गावच्या पाण्याचा प्रश्न शंभर टक्के  सुटू शकतो . त्यासाठी भायगाव ग्रामपंचायतच्या वतीने तसे पत्रही कार्यकारी अभियंता सायली पाटील यांना देण्यात आले आहे. या आवर्तनातून छोटे-मोठे बंधारे  भरले नाही  तर  पिण्याच्या पाण्याची मोठी  बिकट परिस्थिती निर्माण होईल. – राजेंद्र आढाव
– सरपंच ग्रामपंचायत भायगाव