शेतकऱ्यांनी सात नंबर पाणी मागणी अर्ज दाखल करावे – आमदार काळे

कोपरगाव प्रतिनिधी, दि.०१ : मागील वर्षी कमी पर्जन्यमान झाल्यामुळे उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याबरोबरच बारमाही पिकांना जाणवत असलेली तीव्र पाणी टंचाई लक्षात घेवून उन्हाळी आवर्तन तातडीने सोडावे अशी मागणी आ.आशुतोष काळे यांनी पाटबंधारे विभागाकडे केली होती.

त्या मागणीची दखल घेवून पाटबंधारे विभागाकडून उन्हाळी आवर्तन सोडण्याची तयारी सुरू केली आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी मुदतीच्या आत सात नंबर पाणी मागणी अर्ज दाखल करावे असे आवाहन आमदार काळे यांनी दिलेल्या प्रसिध्दी पत्रकात केले आहे.

प्रसिध्दी पत्रकात पुढे असे म्हटले आहे की, कोपरगाव मतदार संघातील अनेक गावात पाणी टंचाई जाणवत असल्यामुळे नागरिकांचा व जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यामुळे बहुतांश टंचाईग्रस्त गावातील नागरीकांची टँकर सुरू करण्याची मागणी जोर धरू लागली होती. त्याचबरोबर गोदावरी कालव्याच्या लाभक्षेत्रातील बारमाही पिकांना व चारा पिकांना देखील पाण्याचे स्त्रोत आटल्यामुळे ह्या पिकांचे भवितव्य धोक्यात आले होते.

त्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी तातडीने उन्हाळी आवर्तन सोडावे तसेच पिण्याच्या पाण्याच्या बरोबरच बारमाही पिकांना सिंचनासाठी पाणी द्यावे. अशी मागणी आमदार काळे यांनी केली होती. त्या मागणीची दखल घेवून पाटबंधारे विभागाकडून उन्हाळी आवर्तन सोडण्याची तयारी सुरू आहे.

त्यासाठी शेतकऱ्यांना सबंधित सिंचन कार्यालयात दि.१२ मे पर्यंत सात नंबर पाणी मागणी अर्ज दाखल करण्यास सांगितले आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांना आपल्या उभ्या बारमाही पिकांसाठी सिंचनाची आवश्यकता आहे.

त्या शेतकऱ्यांनी मुदतीच्या आत आपले सात नंबर पाणी मागणी अर्ज दाखल करावे असे आवाहन आमदार काळे यांनी केले आहे.