पढेगाव-करंजी येथे अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीची आमदार काळेंनी केली पाहणी

तहसीलदारांना पंचानाम्याच्या दिल्या सूचना

कोपरगाव प्रतिनिधी, दि. १७ : कोपरगाव तालुक्यात सलग दुसऱ्या दिवशी अवकाळी पाऊस व सोसाट्याच्या वादळामुळे पढेगाव-करंजी गावात अनेक नागरिकांच्या घरांचे पत्रे उडून नागरिकांचे संसार उघड्यावर पडले आहेत तर चाळीत साठवलेल्या कांद्याचे देखील नुकसान झाले आहे.

अनेक झाडे उन्मळून पडल्यामुळे विजेचा प्रवाह देखील खंडीत होवून विजेच्या पोलांचे व वीज वाहिन्यांचे देखील मोठे नुकसान झाले आहे. याबाबतची माहिती मिळताच आ. आशुतोष काळे यांनी झालेल्या नुकसानीची पाहणी करून तहसीलदारांना तातडीने पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार राज्यात विविध ठिकाणी अवकाळी पाऊस पडत असून त्यामुळे अनेक ठिकाणी नुकसान देखील होत आहे. यातून कोपरगाव तालुका देखील सुटला नसून मागील दोन दिवसापासून कोपरगाव तालुक्यात अवकाळी पाऊस व वादळामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून वीज पडल्यामुळे काही जनावरे देखील दगावली आहे.

अशातच सलग दुसऱ्यांदा गुरुवार (दि.१६) रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास पढेगाव-करंजी गावात अवकाळी गारांचा पाऊस व झालेल्या वादळामुळे अनेक घरांचे मोठे नुकसान होवून यात दोन महिला देखील जखमी झाल्या असून त्यांना कोपरगाव शहरातील खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.तसेच शेतकऱ्यांच्या कांदा चाळीचे देखील नुकसान होवून साठवून ठेवलेल्या कांद्याचे नुकसान झाले आहे.

सदर घटनेची आ. आशुतोष काळे यांनी स्वत: जातीने पाहणी करून झालेल्या नुकसानीचा आढावा घेत नुकसानग्रस्त नागरिकांची व शेतकऱ्यांची भेट घेवून त्यांचे सात्वन केले आहे. तसेच तहसीलदार संदीपकुमार भोसले यांना मदत पुनर्वसन विभागाला झालेल्या घटनेची माहिती पाठवावी अशा सूचना देवून झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून नुकसानग्रस्त नागरिकांना जास्तीत जास्त नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.