मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने सर्व महिलांनी लाभ घ्यावा – नितीनराव औताडे

कोपरगाव प्रतिनिधी,  दि. ६ : शिवसेना पक्षप्रमुख महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्रातील महिलांसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू करून महिलांना आधार दिला आहे. एकाच वेळी झालेली गर्दी बघता सरकारने काही अटी शिथिल करून कागदपत्र पूर्ण करण्यासाठी दोन महिन्याची मुदत दिली आहे. अहमदनगर जिल्ह्यातील सर्व महिला भगिनींनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन शिवसेना जिल्हाप्रमुख नितीनराव औताडे यांनी केली.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी ग्रामीण व शहरी भागातील महिलांनी अर्ज भरण्यास सुरुवात केली आहे मात्र कागदपत्र करताना महिलांची आडवणूक व फसवणूक होत असल्याचे काही ठिकाणी उघड झाले आहे. महिलांकडून अनेक एजंट पैशाची मागणी करत असताना दिसत आहे. तर संबंधित विभागाचे कर्मचारी देखील महिलांचे अर्ज दाखल करून घेण्यास दिरंगाई करत आहे.

ही बाब अत्यंत दुर्दैवी असून असे प्रकार आढळून आल्यास महिलांनी ज्या त्या तालुक्यातील शिवसेनेच्या कार्यालयात संपर्क करावा. अशा प्रवृत्तीचा बंदोबस्त केला जाईल. योजनेत पात्र असलेली एकही महिला यापासून वंचित राहणार नाही याची खबरदारी शासकीय कर्मचाऱ्यांनी घ्यावी असेही औताडे यांनी सांगितले.

महाराष्ट्र राज्यातील महायुतीच्या सरकारच्या कार्यकाळात राज्यातील विविध घटकांच्या उन्नतीसाठी अनेक योजना गेल्या दोन वर्षात राबवण्यात आल्या. त्यात प्रामुख्याने शेतकरी, युवा, पशुपालक, व्यावसायिक उद्योजक अदी सर्व घटकांचा समावेश आहे. महाराष्ट्र राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी तसेच त्यांचे आरोग्य व कुटुंबातील त्यांची निर्णयक भूमिका मजबूत करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या नेतृत्वात कार्यरत असलेल्या महायुतीचे सरकारने महिलांसाठी नवनवीन योजना आणत आहे.

यापूर्वी देखील एसटी प्रवासात 50 टक्के सवलत, मुख्यमंत्री नारीशक्ती योजना, मुलींना उच्च शिक्षणाकरता शिक्षण शुल्क व शिष्यवृत्ती योजना यासह विविध योजना कार्यान्वित केलेल्या आहेत. आता महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला नव्याने मान्यता दिली यामुळे महिलांना महिन्याला दीड हजार रुपये मिळणार आहे.

गेल्या काही दिवसापासून तहसील कार्यालय, सेतू कार्यालय तसेच विविध खाजगी ठिकाणी योजनेचे कागदपत्र पूर्ण करण्यासाठी गर्दी होत आहे. सदर योजनेचे कागदपत्र पूर्ण करण्याचा कालावधी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत वाढवला आहे. त्यामुळे या योजनेतून एकही महिला वंचित राहिला नको. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा 21 ते 65 वयोगटाच्या महिलांनी लाभ घ्यावा अशा आव्हान शिवसेना जिल्हाप्रमुख नितीनराव औताडे यांनी केले.