७१ हजार खात्याच्या पिक विम्याची रक्कम आपल्या पगारातून भारणार – आमदार काळे

कोपरगाव प्रतिनिधी, दि. ९ :  खरीप हंगाम २०२४ साठी पीक विमा भरण्याची सुरुवात १८ जून पासून सुरु झाली आहे. मागील वर्षी असंख्य शेतकऱ्यांनी पिक विमा भरून या योजनेत सहभाग घेतला होता. याहीवर्षी शेतकऱ्यांना पिक विमा योजनेचा लाभ मिळावा यासाठी खरीप हंगामातील सर्वच पिकांचे पिक विम्याचे अर्ज आ. आशुतोष काळे भरणार आहे.

दुष्काळ, अतिवृष्टी, आदी नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान होवून शेतकरी आर्थिक अडचणीत येत असल्यामुळे शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीची भरपाई मिळावी यासाठी शासनाच्या वतीने पिक विमा योजना राबविली जात आहे. पिक पेरणीपासून काढणी पर्यंतच्या कालावधीत पिकांच्या उत्पादनात येणारी घट, पिक पेरणीपूर्व किंवा लावणीपूर्व नुकसान, हंगामातील प्रतिकूल परिस्थितीमुळे नुकसान, काढणी पश्चात पिकाचे नुकसान, स्थानिक नैसर्गिक आपत्ती मुळे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांनी घेतलेल्या पिक विमा योजनेच्या माध्यमातून विमा कंपनी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देते. मागील वर्षी शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचा मोबदला मिळावा यासाठी आ.आशुतोष काळे यांनी केलेल्या पाठपुराव्यातून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना २५ टक्के रक्कम मिळाली असून उर्वरित नुकसान भरपाईची रक्कम मिळावी यासाठी पाठपुरावा सुरु असून हि रक्कम देखील लवकरच मिळणार आहे.

यावर्षी देखील कोपरगाव मतदार संघात पावसाचे प्रमाण समाधानकारक नसले तरी येत्या काळात पावसाची सरासरी भरून निघणार असली तरी कमी पर्जन्यमान किंवा अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होऊ शकते. हे नुकसान टाळण्यासाठी पिक विमा योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे नुकसान भरून येण्यास काही प्रमाणात मदत होणार आहे.

या दृष्टीकोनातून आ.आशुतोष काळे यांनी कोपरगाव मतदार संघातील जवळपास ७१ हजार शेतकऱ्यांच्या खात्याचे सोयाबीन, कापूस, तूर, मका, बाजरी, भुईमूग,खरीप कांदा आदी खरीप पिकांच्या विम्याचे अर्ज भरून पिक विमा रक्कम देखील आपल्या पगारातून विमा कंपनीला अदा करणार आहे. त्यामुळे यदाकदाचित दुर्दैवाने शेतकऱ्यांच्या खरीप पिकांचे नुकसान झाल्यास त्यांना विमा कंपनीकडून नुकसान झालेल्या सर्वच खरीप पिकांची नुकसान भरपाई मिळण्यास मदत होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पिक विमा अर्ज भरणेसाठी बुधवार (दि.१०) पासून जनसंपर्क कार्यालयाशी संपर्क करावा असे आवाहन आ. आशुतोष काळे यांनी केले असून शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण पसरले आहे.

दोन वर्षापूर्वी संपूर्ण जगावर आलेल्या कोविड महामारीत कोपरगाव मतदार संघातील अनेक माता भगिनींना आपले कुंकू गमविले होते. त्यामुळे या माता भगिनींसाठी मोठा धक्का तर होताच मात्र त्यांच्यापुढे आर्थिक अडचणींचा देखील मोठा डोंगर उभा होता. त्यावेळी आ. आशुतोष काळे यांनी अशा माता भगिनींसाठी आपला तीन महिन्याचा पगार भाऊबीजेची ओवाळणी म्हणून दिला होता. व आता पुन्हा एकदा बळीराजाचे नुकसान झाल्यास त्या नुकसानीपासून आर्थिक दिलासा मिळावा यासाठी पुन्हा आपल्या पगारातून पिक शेतकऱ्यांच्या ७१ हजार खात्याच्या पिक विम्याची रक्कम आपल्या पगारातून भागवणार आहे. आ. आशुतोष काळे यांच्या या कृतीतून काळे परिवाराची सामाजिक बांधिलकी अधोरेखित होत आहे.