लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना आमदार काळे यांनी केले अभिवादन

कोपरगाव प्रतिनिधी, दि. १९ : प्रतिभावंत साहित्यिक, संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातील अग्रणी, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुण्यतिथीनिमित्त आ.आशुतोष काळे यांनी कोपरगाव येथे त्यांच्या स्मारकास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

याप्रसंगी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या थोर समाज कार्याला उजाळा देतांना आ. आशुतोष काळे म्हणाले की, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी एक थोर समाजसुधारक, लोककवी आणि लेखक या माध्यमातून समाजासाठी अजोड योगदान देवून आपल्या साहित्यातून सर्व सामान्य माणसांच्या दु:खाला वाचा फोडली. स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्यानंतरच्या काळात राजकीय प्रश्नांविषयी महाराष्ट्रात त्यांनी मोठी जागृती केली.

संयुक्त महाराष्ट्र चळवळ, गोवा मुक्ती संग्राम या चळवळींमध्ये त्यांनी शाहिरीतून दिलेले योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे. महाराष्ट्राच्या एकूणच जडणघडणीत आणि परिवर्तनात या साहित्याचे योगदान महत्त्वपूर्ण असल्याचे आ.आशुतोष काळे यांनी यावेळी सांगितले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, माजी नगरसेवक, कार्यकर्ते व समाजबांधव उपस्थित होते.