डाक विभागाच्या ‘डाक चौपाल’ उपक्रमास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

कोपरगाव  प्रतिनिधी, दि. २६ : आमदार आशुतोष काळे व कोळपेवाडी पोस्ट कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने सुरेगाव, कोळपेवाडी व पंचक्रोशीतील नागरिकांसाठी गुरुवार (दि.२५) रोजी कर्मवीर शंकरराव काळे सभागृह गौतमनगर येथे ‘डाक चौपाल’ या अभिनव उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमास नागरिकांचा उस्त्फुर्त प्रतिसाद मिळाला असून डाक विभागाच्या विविध योजनांची माहिती नागरिकांना मिळाल्यामुळे डाक विभागाचे बदलेले रूप नागरिकांना यावेळी पहायला मिळाले.

ग्रामीण भागातील नागरिकांना डाक विभागाच्या माध्यमातून जास्तीत जास्त बँकिंग सुविधा मिळाव्यात. तसेच आर्थिक लाभाच्या विविध योजनांचा थेट फायदा मिळावा अशा विविध उद्देशातून ‘डाक चौपाल’ उपक्रमाचे आयोजन केले जात असून कर्मवीर शंकरराव काळे सभागृह गौतमनगर येथे कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे व्हा.चेअरमन डॉ. मच्छिंद्र बर्डे, माजी उपसभापती वाल्मिकराव कोळपे, गौतम बँकेचे संचालक राजेंद्र ढोमसे, सुरेगावच्या प्रथम लोकनियुक्त सरपंच सौ. सुमनताई कोळपे,कोळपेवाडीच्या प्रथम लोकनियुक्त सरपंच सौ.चंद्रकला कोळपे, उपसरपंच सौ. सुनिता कोळपे, शहाजापूरच्या प्रथम लोकनियुक्त सरपंच सौ. मनीषा माळी,कोळगाव थडीच्या सरपंच सौ.मीनल गवळी, डाक अधीक्षक हेमंत खडकीकर, डाक निरीक्षक अनंत सोनवणे, आयबीपी चे मॅनेजर स्वप्नील सावंत, विजय कोल्हे, पोस्ट मास्तर अमोल वाघमारे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत ‘डाक चौपाल’ उपक्रम राबविण्यात आला.

याप्रसंगी बोलतांना व्हा.चेअरमन डॉ मच्छिंद्र बर्डे म्हणाले की, ‘डाक चौपाल’ या उपक्रमाच्या माध्यमातून नागरिकांना विविध उपक्रमांचा लाभ मिळणार असून यामध्ये ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये आर्थिक साक्षरता निर्माण करणे, ग्राहकाच्या बचत खात्या सोबत आधार नंबरची जोडणी करणे. नवजात बाळाचे आधार रजिस्ट्रेशन करणे, जुने आधार अपडेट करणे, ग्रामीण भागातील नागरिकांना ग्रामीण टपाल जीवन विमा, अपघाती विमा, आधार-मोबाईल नंबर लिंकिंग, महिला सन्मान बचत पत्र,ज्येष्ठ नागरिक योजना, मातृ वंदन खाते सुरु करणे, सुकन्या समृद्धी योजना, टपाल जीवन विमा, तसेच बहुचर्चित असलेल्या ‘मुख्यमंत्री माझी, लाडकी बहिण’ योजनेसाठी महिलांचे झिरो बँलंसमध्ये पोस्टात बचत खाते सुरु करणे अशा विविध योजनांचा लाभ नागरिकांना या ‘डाक चौपाल’ उपक्रमाच्या माध्यमातून नागरिकांना मिळणार असून नागरिकांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन व्हा.चेअरमन डॉ मच्छिंद्र बर्डे यांनी यावेळी केले.   

एकेकाळी मर्यादित सुविधा देणाऱ्या डाक विभागाने बदलत्या काळानुसार आपल्या कार्य पद्धती व सुविधांमध्ये अमुलाग्र बदल करून घेत काळाची गरज ओळखून नागरिकांसाठी अनेक सुविधा व विविध योजना आणल्या आहेत. या योजनांची माहिती तळागाळातील पात्र लाभार्थी नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी ‘डाक चौपाल’ उपक्रम अतिशय महत्वाची भूमिका बजावणार असून ग्रामीण भागातील सर्वसमान्य नागरिक व डाक प्रशासन यांना जोडणारा दुवा म्हणून ‘डाक चौपाल’ उपक्रम नागरिकांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार असल्याचे डाक अधीक्षक हेमंत खडकीकर यांनी सांगितले. यावेळी पोस्ट मास्तर अमोल वाघमारे व त्यांच्या सहकाऱ्यांनी नागरिकांना विविध योजना समजावून सांगत आवश्यक असणाऱ्या कागदपत्रांची माहिती दिली. या उपक्रमाला नागरिकांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाला.