एसएसजीएम महाविद्यालयाचा शरद पवारसाहेब यांच्या हस्ते सन्मान

कोपरगाव प्रतिनिधी, दि. २४ : सातारा येथे रयत शिक्षण संस्थेच्या वतीने आयोजित पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या १३७ व्या जयंतीनिमित्त श्री सद्गुरु गंगागीर महाराज सायन्स, गौतम आर्ट्स अँड संजीवनी कॉमर्स महाविद्यालयाचा रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा. शरद पवार साहेब व रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी, व्हा.चेअरमन अॅड. भगीरथ शिंदे सो. यांच्या शुभहस्ते विशेष सन्मान करण्यात आला.

महाविद्यालयाने नुकतेच नॅशनल असेसमेंट अँड ऍक्रिडेशन कौन्सिलचे चौथे सायकल पूर्ण केले. त्यात महाविद्यालयाने३.६९ गुणांसह  A++ श्रेणी प्राप्त केली. नॅशनल असेसमेंट अँड ऍक्रिडेशन कौन्सिलने ( नॅक ) घालून दिलेल्या निकषानुसार शैक्षणिक प्रक्रियेत महाविद्यालयाने पाच वर्षात केलेली कामगिरी, अभ्यासक्रमाची निवड, शॉर्ट टर्म कोर्सची निवड आणि अंमलबजावणी, शैक्षणिक दर्जा आणि मूल्यमापन, विद्यार्थ्यांचे निकाल, संशोधन कार्य आणि विद्या शाखा सदस्यांचे राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय शोध निबंधाचे प्रकाशन, प्राध्यापकांना मिळालेले पेटंट, मूलभूत सुविधा या साधनांची स्थिती, प्रशासन, आर्थिक स्थिती, डिजिटल ग्रंथालय, प्रयोगशाळा, उपकरणे, 

संगणक यासारख्या पुरविल्या जाणाऱ्या पायाभूत सुविधा, महाविद्यालयात प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी वर्ग विद्यार्थी या सर्वांना दिल्या जाणाऱ्या सुविधांचे काटेकोर निरीक्षण, शिक्षक आपल्या दारी ( Teacher at the door ), कमवा आणि शिका योजना,  स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र, सांस्कृतिक उपक्रम, राष्ट्रीय सेवा योजना, राष्ट्रीय छात्र सेना, कंपोस्ट खत निर्मिती, जैविक गॅस, रेन वॉटर हार्वेस्टिंग, ग्रीन ऑडिट, एनर्जी ऑडिट हे शैक्षणिक गुणवत्ता उंचावण्याच्या दृष्टीने महाविद्यालयातील उपक्रम समितीला जमेच्या बाजू ठरल्या. समितीने आजी- माजी विद्यार्थी, पालक, शिक्षक, शिक्षकेतर सेवक, विविध समिती प्रमुख यांच्याशी  बैठका घेऊन सुसंवाद साधून मूल्यांकन केले.

रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आदरणीय शरदचंद्र पवार साहेब यांनी महाविद्यालयातील सर्वांचे हार्दिक अभिनंदन केले. एस. एस. जी .एम. महाविद्यालय कोपरगाव विकास समितीचे चेअरमन अॅड.भगीरथ शिंदे यांनी महाविद्यालयाच्या विकासासाठी  विस्तारासाठी मौलिक महत्त्वाच्या सूचना केल्या. विद्यार्थी , प्राध्यापक , पालक यांच्या बैठका घेऊन त्यांना उत्तेजन दिले. त्यांच्यात आत्मविश्वास जागवला. एस .एस . जी . एम .महाविद्यालय हे एक अतिशय प्रगत आणि वैशिष्ट्यपूर्ण महाविद्यालय म्हणून लक्षणीय आहे. दिवसेंदिवस महाविद्यालयाची संख्यात्मक आणि गुणात्मक वाढ लक्षात घेऊन महाविद्यालयात विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचे नाविन्यपूर्ण कोर्सेस सुरू केले .बी.बी.ए,  बी.एस्सी कॉम्प्युटर सायन्स, वनस्पती शास्त्र संशोधन केंद्र हे कोर्सेस सुरू केले.

रसायनशास्त्राच्या पदव्युत्तर वर्गाच्या वाढीव तुकड्या सुरू केल्या. दरवर्षी विद्यार्थी संख्येमध्ये वाढ होत आहे. या विद्यार्थ्यांना आवश्यक त्या भौतिक यंत्रणा उभी करावी, या दूरदृष्टीचा विचार करून साडेचार कोटींची वीस हजार स्क्वेअर फुटाची दोन मजली इमारत अनेक वर्ग आणि खुल्या प्रयोगशाळा असलेल्या इमारतीची पायाभरणी केली. क्लासरूम, क्रीडांगण, ऑडिटोरियम हॉल यांना जेवढे महत्त्व तेवढेच महत्त्व कॅन्टीनला देऊन विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणाबरोबरच कॉलेज परिसरात पौष्टिक आणि चविष्ट आहार मिळावा म्हणून उत्तम कॉलेज कॅन्टीन सुरू केले.तसेच मुलींच्या वसतिगृहात सर्व सोयींनी युक्त  अशा डायनिंग हॉलची व्यवस्था केली आहे.

नॅक समिती समोर महाविद्यालयाने सर्व उपक्रमांचे सादरीकरण केले व समितीशी संवाद साधला. या सर्व उपक्रमामुळेच महाविद्यालयाला यश मिळाले आहे. या निमित्ताने हा सन्मान सातारा येथे स्वीकारण्यासाठी रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडीचे सदस्य व महाविद्यालय विकास समितीचे सदस्य अॅड. संदीप वर्पे, महाविद्यालयाच्या प्र. प्राचार्या प्रोफेसर डॉ. उज्ज्वला भोर, कला विभागाचे उपप्राचार्य प्रोफेसर डॉ. बाबासाहेब शेंडगे, प्रोफेसर डॉ. मोहनराव सांगळे, आय.क्यू. ए.सी. चे समन्वयक प्रा. डॉ. निलेश मालपुरे, प्रा. डॉ. बंडेराव तऱ्हाळ व कार्यालयीन अधीक्षक श्री. सुनील गोसावी उपस्थित होते. याबद्दल रयत शिक्षण संस्थेचे व्हाईस चेअरमन व महाविद्यालय विकास समितीचे चेअरमन अॅड. भगीरथ शिंदे यांनी महाविद्यालय विकास समितीच्या सर्व सदस्यांचे, प्राचार्य, आय. क्यू. ए.सी. चेअरमन, सर्व विभाग प्रमुख, माजी विद्यार्थी, आजी विद्यार्थी, पालक, प्राध्यापक, विद्यार्थी विद्यार्थिनी व कार्यालयीन सेवकांचे अभिनंदन केले.