शेवगाव प्रतिनिधी, दि. १७ : राज्याच्या भवितव्यासाठी ही निवडणूक अतिशय महत्त्वाची आहे. सध्या विकासा पेक्षा इतर गोष्टीवर अधिक चर्चा केली जाते. लोकसभा निवडणुकीवेळी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी प्रचार केला होता, भाजपला चारशे जागा मिळाल्या तर बाबासाहेबांचे संविधान बदलतील. मात्र संविधानातील मूलभूत तत्व कोणीही बदलू शकत नाही. अशी वस्तुस्थिती असून ती कोणाला ही बदलण्याचा अधिकार नाही, संसदेला देखील नाही, त्यामुळे संविधान बदलण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. उलट काँग्रेस पक्षाने संविधानात तोडमोड करून खऱ्या अर्थाने बाबासाहेबांच्या संविधानाचा फज्जा काँग्रेस पक्षाने उडवल्याचे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले आहे. महायुतीच्या उमेदवार आमदार मोनिकाताई राजळे यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते.
यावेळी गडकरी म्हणाले, ही विधानसभा निवडणुक महाराष्ट्राला दिशा देणारी असून विकासाच्या शिलेदार बनविण्यासाठी तुम्ही आ. राजळेंना विधानसभेत पाठवा. मी राष्ट्रीय महामार्ग व तुमच्या मतदार संघातील विकासाचे प्रश्न सोडविण्यासाठी तुमच्या सोबत आहे. माझेकडे द्रौपदीची थाळी आहे. तुमच्या मतदार संघाचा सर्वांगिण विकासासाठी निधी कमी पडु देणार नाही.
यावेळी आमदार मोनिकाताई राजळे, आमदार महेश कासवाल, ज्येष्ठ नेते बापूसाहेब भोसले, भिमराव फुंदे, अशोक चोरमले, बापूसाहेब पाटेकर, दिनेश लव्हाट, आशुतोष डहाळे, बाबा राजगुरु, उमेश भालासिंग, भगवान बांगर, डॉ. निलेश मंत्री, कमलेश गांधी, अशोक आहुजा, शोभा अकोलकर, आशाताई गरड, रणजीत बेळगे, गंगा खेडकर, आदीसह महायुती घटक पक्षांचे, पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी गडकरी म्हणाले, जे कामावर निवडून येत नाहीत, ते जात पुढे करतात. लाडकी बहीण योजनेमध्ये अनेक आपल्या बहिणींना महिन्याला अनुदान देतोय, योजनेच्या अर्जावर कुठं लिहिल आहे का? की दलित आणि मुसलमानांनी अर्ज करता कामा नये. जेव्हा रेस्टॉरंट मध्ये जायचं असते तेव्हा जातीच हाँटेल पाहतो का. रुचकर जेवण मिळते तिथे जाता. जेव्हा हार्ट ऑपरेशन करायचं असतं तेव्हा जात पाहात नाही कोणताही चांगला डॉक्टर चालतो. मग निवडणुकीत जातीची चर्चा का करता.
आमदार मोनिकाताई राजळे या माझे मित्र अशोकपाटील डोणगावकर यांच्या कन्या आहेत. त्यांना विकासाची चांगली समज आहे. उच्च शिक्षीत आहेत. गेल्या दहा वर्षात त्यांनी मतदार संघात चांगले काम करुन लोकप्रियता मिळवली आहे. मोनिका राजळेंना विजयी करा. आहील्यानगर ही सहकार शिक्षण क्षेत्राची व चळवळीची भुमी आहे. माजीमंत्री अशोकराव डोणगावकर यांची कन्या असलेल्या मोनिका राजळे यांना विकासाची चांगली दृष्टी आहे. त्यांनी मतदार संघाचा विकास करुन जनेतमधे लोकप्रियता मिळवलेली आहे. त्यंना पुन्हा जनतेची सेवा करण्याची संधी द्या.
यावेळी बोलताना आमदार मोनिका राजळे म्हणाल्या, पंकजा मुंडे ग्रामविकास मंत्री असताना त्यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री ग्रामसडक
योजना, जलयुक्त शिवार योजना, या मतदारसंघांमध्ये प्रभावीपणे राबवली. अनेक साखळी बंधारे झाले. शेतीसाठी पाणी उपलब्ध झालं. शेवगाव शहराची पाणीपुरवठा योजना खूप वर्षापासून प्रलंबित होती. जे आज आमच्यावर आरोप करताय की, दहा वर्षे आमदारांनी या शहरासाठी काय केलं. माझा त्यांना प्रश्न आहे की, गेल्या २५ ते ३० वर्ष तुमच्या हाती सत्ता होती. मात्र तुम्ही शेवगाव शहराचा पाणीपुरवठा प्रश्न सोडवू शकले नाही.
परंतु आमच्या सरकारच्या काळात २०१९ ला शेवगाव शहराची पाणीपुरवठा योजना मंजूर झाली आणि एक महिन्यापासून त्याच काम या ठिकाणी सुरु झाले आहे. भाजप सरकारच्या माध्यमातून कारखान्याला १५० कोटी कर्ज मिळाले, की पलटी मारल्याचा टोला नाव न घेता आमदार मोनिका राजळे यांनी लगावला. राजीव सुरवसे यांनी सुत्रसंचालन केले. बापुसाहेब पाटेकर यांनी आभार मानले.