संजीवनीच्या कॉम्प्युटर व इलेक्ट्रिकल इंजिनिअरींग विभागांना एनबीए टिअर १ मानांकन – अमित  कोल्हे

कोपरगांव प्रतिनिधी, दि. २६ : संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या कॉम्प्युटर इंजिनिअरींग व इलेक्ट्रिकल इंजिनिअरींग या दोन विभागांना नॅशनल बोर्ड ऑफ अॅक्रिडीटेशन (एनबीए), नवी दिल्लीने टिअर १, इंटरनॅशनल नॉर्मस् वाशिंग्टन अॅकॉर्ड नुसार मुल्यांकन करून पुढील तीन वर्षांसाठी मानांकन बहाल केले.

अहिल्यानगर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर आणि  उत्तर महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांमधून संजीवनी इंजिनिअरींग कॉलेज हे अशा  प्रकारचे मानांकन प्राप्त करणारे पहिले व एकमेव महाविद्यालय ठरले आहे, संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालय ही ग्रामिण महाराष्ट्रातील  दुसरी व उत्तर महाराष्ट्रातील  पहिली ऑटोनॉमस  दर्जा प्राप्त संस्था आहे, अशी  माहिती संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे  मॅनेजिंग ट्रस्टी अमित  कोल्हे यांनी दिली आहे.

संजीवनी अभियांत्रिकी  महाविद्यालयाच्या या अभुतपुर्व उपलब्धीबाबत संजीवनीचे अध्यक्ष नितीनदादा कोल्हे, मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे यांनी डायरेक्टर डॉ. ए.जी. ठाकुर,  विभाग प्रमुख डॉ. डी.बी. क्षिरसागर, डॉ. डी.बी. परदेशी , एनबीए समन्वयक डॉ. ए. एस. सय्यद, कॉम्प्युटर व इलेक्ट्रिकल इंजिनिअरींग विभागाचे एनबीए समन्वयक अनुक्रमे प्रा. एस.ए. शिवरकर  व डॉ. जी. विजयाकुमार यांचे अभिनंदन करून नितिनदादा कोल्हे यांनी या सर्वांचा छोटेखानी कार्यक्रमात सत्कार केला.

पत्रकात अमित कोल्हे यांनी म्हटले आहे की, माजी मंत्री व संजीवनी ग्रुप ऑफइन्स्टिट्यूट्सचे संस्थापक अध्यक्ष कै. शंकरराव  कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली २००३ सालापासुन एनबीएच्या कसोटीला सामोरे जाणारे संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालय हे ग्रामिण महाराष्ट्रातील  एकमेव अभियांत्रिकी महाविद्यालय आहेे. तेव्हापासुन सर्वच पात्र विभाग मानांकन प्राप्त ठरले आहेत.

कॉम्प्युटर इंजिनिअरींग विभागाने यापुर्वी टिअर २च्या निकषांनुसार ४ वेळेला एनबीए मानांकन प्राप्त केले होते. इलेक्ट्रिकल इंजिनिअरींग विभाग २०१७-१८ या शैक्षणिक वर्षापासून  सुरू झाला. त्यामुळे एनबीए मानांकनाच्या कसोटीस पात्र होताच आता या दोनही विभागाने टिअर १च्या आंतरराष्ट्रीय निकषांनुसार  मुल्यांकन करून घेवुन एनबीए मानांकन  प्राप्त केले. यामुळे विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय  पातळीवर प्रत्येक क्षेत्रात फायदा होणार आहे.

एनबीए मानांकन प्राप्त दोनही विभागातील मागील तीन वर्षातील  प्रवेश  संख्या, पी.एच.डी. असणारे शिक्षक , विद्यार्थी-शिक्षक  प्रमाण, प्रथम वर्षात  प्रवेश  घेतलेल्या  सलग चार वर्षात  उत्तिर्ण होणाऱ्या  विद्यार्थ्यांचे वाढते प्रमाण, उच्च शिक्षणासाठी जाणारे विद्यार्थी आणि संस्थेच्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागामार्फत विद्यार्थ्यांना नामांकित कंपन्यांमध्ये मिळणाऱ्या नोकऱ्यांचे  प्रमाण, शिक्षकांनी आधुनिक ज्ञानवृध्दीसाठी पुर्ण केलेले परीसंवाद, सादर केलेले शोधनिबंध व कार्यशाळांची संख्या, कन्सलटन्सी, विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रात मिळविलेले प्राविण्य, सुसज्य प्रयोगशाळा , नामांकित कंपन्या व परदेशी  विद्यापीठांशी केलेले सामंजस्य करार, अशा  अनेक बाबींचा चढत्या कमानीचा अहवाल एनबीए कार्यालयाला सादर केला होता.

विशेष  म्हणजे मागील शैक्षणिक वर्षात  तब्बल ७५० नवोदित अभियंत्यांना वार्षिक पॅकेज रू २७ लाखांपर्यंतच्या दिलेल्या नोकऱ्या , या उपलब्धीची एनबीए समितीने विशेष  दखल घेतली. एनबीए कार्यपध्दतीनुसार एनबीए समितीने दोनही विभागांनी सादर केलेल्या सर्व बाबींची पुराव्यासहीत परीमानांनुसार पडताळणी केली आणि भेटीनंतर लागलीच एका महिन्यात दोनही विभागांना पुढील तीन वर्षांसाठी  एनबीए मानांकन  बहाल केल्याबाबतचे अधिकृत पत्र दिले.

महाराष्ट्रातच  नव्हे तर संपुर्ण देशात अनेक अभियांत्रिकी महाविद्यालये आहेत. परंतु फार थोड्या संस्था एनबीएच्या कसोट्यांना सामोरे जाण्याचे धाडस करतात. मात्र महाराष्ट्राच्या  ग्रामिण भागातुन आत्मविश्वासाच्या जोरावर २००३ पासुन एनबीए च्या कसोट्यांना सामोरे जाण्याचे संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालय धाडसी पावुल टाकित आहे. आता तर टिअर १ नुसार एनबीए मानांकन  प्राप्त केले आहे.

सध्या आवुटकम बेस्ड एज्युकेशनच्या माणकाप्रमाणे तपासणी करण्यात येते. अतिशय कठीण मानके असलेल्या कसोट्यांना  दोनही विभाग सामोरे गेले. आता दोनही विभागाने दर्जा व गुणवत्ता टिकवुन ठेवत पुन्हा तीन वर्षांसाठी एनबीए (टिअर १) मानांकन प्राप्त करून संजीवनीच्या शिरेपेचात मानाचा तुरा खोवला आहे, असे कोल्हे यांनी शेवटी म्हटले आहे.