शेवगाव प्रतिनिधी, दि.२९ : शेवगावात वाहतूक कोंडी झाली नाही असा दिवस जात नाही. सध्या ऊस गळीत हंगामामुळे तर वाहतूक कोंडीचे प्रमाण वाढले आहे. दोन दिवसापूर्वी ऊसाच्या जुगाडाचा ट्रँक्टर येथील नगर रस्त्यावरील उतारावर रस्त्याच्या मधोमध अडवा झाल्याने तब्बल सहा तास वाहतुकीचा खेळखंडोबा झाला.

कोडींत अडकलेल्या वाहनांना वाट काढून देण्यासाठी पोलीसांबरोबर प्रवाशांनी वाहुतक सुरळीत केली. या वाहतुक कोंडीमुळे शेवगावच्या वाहतुक कोंडीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मराठवाडयाकडे जाणारी अवजड वाहतुक, प्रवाशी वाहतुक करणारी वाहने,बस, ऊसांनी भरलेली वाहने यांचा ताण शहरातील वाहतुकीवर झाला आहे.

येथील अरुंद रस्ते, दोन्ही बाजूने झालेली अतिक्रमणे, त्यापुढे ग्राहकांची दुचाकी व चारचाकी वाहने, रस्त्यावरच भरणारा बाजार यामुळे दररोज रात्रंदिवस वाहतुक कोंडी होते. क्रांती चौकातून आंबेडकर चौक, गाडगेबाबा चौक, नेवासा रस्ता या रस्त्यावर कायमस्वरुपी वाहतुक कोंडी होत असते.

दुपारी २ वाजता शहरातील आंबेडकर चौकातून क्रांती चौकाकडे जात असलेल्या हार्वेस्टर मशिननेने तोडणी केलेल्या ‘ऊसाने भरलेल्या जुगाडाच्या टँक्टरला ( क्रमांक – एम.एच १७ एव्ही.८३६६ ) उतारावर एका रिक्षावाल्याने कट मारला. त्यामुळे चालकाने अचानक ब्रेक लावल्याने दोन्ही ट्राँल्या टँक्टरवरती आदळल्या. त्यामुळे ट्रँक्टर दुभाजकावर चढल्याने दोन्ही बाजुची वाहने अडकली.

सुदैवाने या वेळी अपघातात जिवीतहानी झाली नाही. मात्र दुपारी २ पासून रात्री ७ वाजेपर्यंत नगर, पाथर्डी, नेवासा, पैठण रस्त्यांवर तीन ते चार किमीपर्यंत वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या. त्यात आठवडे बाजार व विवाहाची तिथी ही मोठी असल्याने वाहनांची मोठी गर्दी झाल्याने वाहतुक कोंडीत मोठी भर पडली. या कोंडीतून वाहने काढतांना चालकांना मोठा त्रास सहन करावा लागला.

शहरामध्ये सतत होणा-या वाहतुक कोंडीकडे नगरपरिषद व पोलीस प्रशासन जाणूनबुजून दुर्लक्ष करीत आहेत. रस्त्यावर अडव्या झालेल्या ट्रँक्टरमुळे कोंडी होवून प्रवाशी व नागरीकांना मनस्ताप सहन करावा लागला. कोंडीकडे दुर्लक्ष करणा-या वाहतुक पोलीस कर्मचा-यांची चौकशी करावी. यामध्ये दोषी असणा-यांवर कडक कारवाई करण्याची मागणी जिल्हाधिकारी व पोलीस अधिक्षकांकडे निवेदनाव्दारे केली आहे. – डॉ. निरज लांडे, अध्यक्ष शिवस्मारक समिती शेवगाव
