पत्रकारितेतून सेवाभावी ध्येय साध्य करा – परमानंद महाराज

कोपरगाव प्रतिनिधी, दि. ४ : पत्रकारिता ही केवळ घटना सांगणारी नव्हे, तर दिशा देणारी असावी. स्पर्धेच्या युगात टिकण्यासाठी पत्रकारांनी आपली मूल्ये आणि हेतू विसरता कामा नये. बातमी मागची भूमिका ही समाज घडवणारी असावी. पत्रकारिता ही एक साधना आहे. संतांची शिकवण, ध्यान, आणि आत्मजागृती यांचा समावेश पत्रकारितेच्या जीवनात झाला पाहिजे.

पत्रकारितेतून सेवाभावी ध्येय साध्य करा, असे आवाहन आत्मा मलिकचे प्रमुख परमानंद महाराज यांनी केले. ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ (VOM) इंटरनॅशनल फोरम यांच्या वतीने कोकमठाण येथील आत्मा मलिकच्या पावन भूमीत दोन दिवसीय पत्रकारांच्या केडर कॅम्पचा शुभारंभ परमानंद महाराज, आ. अमोल खताळ, संजीवनी उद्योग समूहाचे प्रमुख बिपीन कोल्हे यांच्या हस्ते झाला.

 पत्रकारिता ही केवळ बातमी पोहोचवण्याचे साधन नाही, तर ती एक शास्त्र आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, आचार्य अत्रे, बाळशास्त्री जांभेकर यांच्या काळात पत्रकारिता म्हणजे राष्ट्रीय उभारणीचे एक माध्यम होते. त्या काळच्या छपाईपासून ते डिजिटल लाईव्ह पर्यंत पत्रकारितेचा प्रवास झाला आहे. परंतु दर्जा टिकवणे हे फार मोठं आव्हान बनलं आहे. पत्रकारितेतील स्पर्धा, वेळेचे बंधन आणि तणाव यामुळे अनेकदा बातमीला विचारांचा आणि मूल्यांचा अभाव राहतो.

आत्मशोध आणि ध्यान हे केवळ वैयक्तिक शांतीसाठी नाही, तर पत्रकारितेतील गुणवत्तेसाठी देखील आवश्यक आहे, असे सांगून त्यांनी पुढे म्हटले की, “प्रत्येकाने दररोज स्वतःसाठी दिवसातील फक्त पंधरा मिनिटे दिली, तर पत्रकार आणि माणूस म्हणून अधिक स्पष्ट, स्थिर आणि समंजस होईल.” आत्मा म्हणजेच ती चेतना जी आपल्या कर्मात, विचारात आणि शब्दात प्रकट होते. शब्द हे राष्ट्रनिर्मितीचे साधन आहेत. तेच शब्द अज्ञान नष्ट करू शकतात आणि लोकशाही सुदृढ करू शकतात, असा मोलाचा संदेश त्यांनी पत्रकारांना दिला.

संगमनेरचे आमदार अमोल खताळ म्हणाले की, “पत्रकारिता हा एक अत्यंत जबाबदारीचा व्यवसाय आहे. पत्रकार हे समाजाचे दर्पण असतात.” महायुती सरकारच्या माध्यमातून मुख्यमंत्री आणि आता उपमुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांसाठी महामंडळ स्थापन करणार असल्याचे आश्वासन दिले होते. “मी एक त्यांचा शिलेदार म्हणून नक्कीच त्यांच्यापर्यंत हे आश्वासन पोहोचवेल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

संजीवनी उद्योग समूहाचे प्रमुख बिपीन कोल्हे म्हणाले की, “पत्रकार हा सत्याचे आणि खोट्याचे विश्लेषण करणारा असतो, आणि ज्ञानाचा स्रोतही असतो. ग्रामीण भागातील पत्रकारांसाठी ही कार्यशाळा फार उपयुक्त ठरेल. तंत्रज्ञानाचा योग्य वापर करून सरकार किंवा समाजातील महत्त्वाच्या गोष्टींवर पत्रकारांनी प्रकाश टाकला पाहिजे,” असा सल्ला त्यांनी दिला.

‘व्हॉईस ऑफ मीडिया’चे प्रदेशाध्यक्ष अनिल म्हस्के यांनी ‘व्हॉईस ऑफ मीडिया’चे कार्य सर्वासमोर प्रस्ताविकातून ठेवले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष गोरक्षनाथ मदने यांनी केले. या वेळी  समाजशास्त्राच्या अभ्यासक प्रा. सविता गिरे पाटील, आत्मा मलिक ट्रस्टचे नंदकुमार सूर्यवंशी, विश्वस्त प्रदीप कुमार भंडारी, महाराष्ट्र भूषण व्यंकटेश जोशी, जोतिषाचार्य जयंत पारधी गुरुजी, ‘व्हॉईस ऑफ मीडिया’च्या आरोग्यसेल प्रमुख भीमेश मुतुला, ‘व्हॉईस ऑफ मीडिया’च्या महिला विंगच्या प्रदेशाध्यक्ष रश्मी मारवाडी, सविता चंद्रे संपूर्ण राज्यभरातून विविध जिल्ह्यातून आलेले पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply