जे करणार तेच सांगणार – पराग संधान

कोपरगाव प्रतिनिधी, दि. १४ : राजकारणात आश्वासनांची रेलचेल असते, मात्र आम्ही शब्द आणि कृती यामध्ये कधीही अंतर ठेवत नाही. मी जे बोलतो ते करतो आणि जे करणार आहे तेच जनतेसमोर मांडतो, असे ठाम प्रतिपादन भाजपा मित्रपक्षांचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार पराग संधान यांनी केले. यासह प्रचारात आम्हाला आजच विजयी झाल्यासारखे वातावरण असून मोठ्या मताधिक्याने आम्ही विजयी होणार आहे असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

कोपरगाव शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आणि सामान्य नागरिकांच्या दैनंदिन अडचणी समजून घेण्यासाठी जनतेच्या थेट सूचनांतून ‘विश्वासनामा’ तयार करण्यात आला आहे. हा विश्वासनामा कोणत्याही बंद दालनात तयार केलेला नसून, शहरातील नागरिक, व्यापारी, महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक, शेतकरी आणि विविध घटकांशी संवाद साधून त्यांच्या अपेक्षा, समस्या आणि सूचना ऐकून तयार करण्यात आला आहे.

कोपरगाव शहरातील रस्ते, धूळ,पाणीपुरवठा, स्वच्छता, आरोग्य सेवा, शिक्षण, वाहतूक, बाजारपेठेतील सुविधा, महिला व ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षिततेसह अनेक लहान-मोठ्या प्रश्नांवर व्यवहार्य, ठोस आणि वेळेत पूर्ण होणाऱ्या उपाययोजना या विश्वासनाम्यात समाविष्ट करण्यात आल्या आहेत. केवळ घोषणा न करता प्रत्यक्ष अंमलबजावणीवर भर देण्याचा आमचा स्पष्ट दृष्टिकोन असल्याचेही पराग संधान यांनी सांगितले.

सामान्य माणसाच्या लहान वाटणाऱ्या समस्या या प्रत्यक्षात त्याच्या रोजच्या जगण्याशी निगडीत असतात. त्या समस्या सोडवणे हीच खरी लोकसेवा आहे, असे सांगत त्यांनी या समस्यांवर विधायक, पारदर्शक आणि परिणामकारक उपाय राबवण्याची ग्वाही दिली.

कोपरगावच्या विकासासाठी राजकारणापेक्षा काम, विश्वास आणि संवाद या त्रिसूत्रीवर आधारित कार्यपद्धती स्वीकारली असून, जनतेने दिलेल्या विश्वासाला कधीही तडा जाऊ देणार नाही, असा विश्वास पराग संधान यांनी व्यक्त केला. जनतेच्या सहभागातून उभा राहिलेला हा विश्वासनामा म्हणजेच कोपरगावच्या उज्ज्वल भविष्याचा पाया असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले.

Leave a Reply