एआयमुळे पुढील पाच वर्षांत आमूलाग्र बदल होणार  – अच्युत गोडबोले

कोपरगांव प्रातिनिधी, दि. 31 : मागील दहा वर्षांत तंत्रज्ञान क्षेत्रात अभूतपूर्व बदल झाले असून येत्या पाच वर्षांत कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) सर्वच क्षेत्रांचे स्वरूप बदलून टाकणार आहे. त्यामुळे एआयचे महत्त्व समजून घेऊन त्याचा प्रभावी वापर आत्मसात करणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन प्रख्यात तंत्रज्ञान अभ्यासक व लेखक अच्युत गोडबोले यांनी केले.

   संजीवनी इंजिनिअरींग काॅलेजमध्ये प्रथम वर्ष, थेट द्वितीय वर्ष इंजिनिअरींग तसेच एमबीएच्या प्रथम वर्षातील नवागत विध्यार्थ्यांच्या स्वागत व मार्गदर्शन  समारंभात गोडबोले पाहुणे म्हणून दुसरे पुष्प  गुंफताना बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संजीवनी युनिव्हर्सिटीचे प्रेसिडेंट तथा संजीवनी ग्रुप ऑफ  इन्स्टिट्यूट्सचे  मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे होते. यावेळी व्यासपीठावर संजीवनी ग्रुप ऑफ  स्कूल्सच्या संचालिका डाॅ. मनालीताई कोल्हे, डायरेक्टर डाॅ. आर. ए. कापगते, डाॅ. डी.बी. क्षिरसागर, डाॅ. ए.बी. पवार, डाॅ. व्ही. एम. तिडके उपस्थित होते.  

    यावेळी गोडबोले यांनी एआयच्या वाढत्या प्रभावाविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. थ्री-डी प्रिंटिंग आणि एआयच्या साहाय्याने बांधकाम क्षेत्रात क्रांती घडत असून अवघ्या २४ तास ४५ मिनिटांत १० मजली इमारत उभारण्याचा विक्रम शक्य झाल्याचे त्यांनी सांगितले. एआयच्या मदतीने रचना, नियोजन आणि अंमलबजावणी अधिक अचूक व जलद होत असल्याने वेळ, खर्च आणि मनुष्यबळाची बचत होत आहे, असे त्यांनी नमूद केले.

शिक्षण क्षेत्रातही एआयमुळे आमूलाग्र बदल होणार असून विध्यार्थ्यांना अधिक वैयक्तिक आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळेल. भविष्यात शिक्षकांची भूमिका केवळ ज्ञान देणाऱ्यांऐवजी मार्गदर्शक आणि सुविधा उपलब्ध करून देणारी असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे विद्यार्थ्यांनी  एआयकडे केवळ तंत्रज्ञान म्हणून न पाहता भविष्यातील संधी म्हणून पाहावे आणि त्याचे ज्ञान आत्मसात करून स्पर्धात्मक जगासाठी स्वतःला तयार करावे, असे आवाहन त्यांनी केले.

    अध्यक्षिय भाषणात अमित कोल्हे यांनी सांगीतले की विद्यार्थ्यांनी  प्रथम वर्षात आपल्या शाखेनुसार भविष्यातील करीअरच्या दृष्टीने निरीक्षणे नोंदवावीत व दुसऱ्या वर्षापासून  नोकरी, उच्च शिक्षण  आणि उद्योजक यापैकी कोणता मार्ग निवडायचा, याचा विचार करून स्वतःला सक्षम करणे गरजेचे आहे. या पर्यांयांमध्ये चांगली नोकरी मिळवायची असेल तर आपल्या शाखेचे  सखोल ज्ञान, विविध कौशल्ये आणि जापनीज, रशियन, जर्मन व कोरियन यापैकी एक अवगत भाषेच्या  ज्ञानाच्या जोरावर १०० टक्के चांगली नोकरी मिळु शकते, असे नमुद केले.

डॉ. कापगते यांनी उपस्थितांचे स्वागत करताना सांगितले  की, संजीवनीचे संस्थापक स्व. शंकरराव कोल्हे यांनी रुजविलेल्या दूरदृष्टीपूर्ण विचारांचा वारसा संस्थेचे अध्यक्ष नितीनदादा कोल्हे आणि मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे समर्थपणे पुढे नेत आहेत. विशेषतः ग्रामीण भागातील विध्यार्थ्यांना  जागतिक दर्जाच्या संधी उपलब्ध करून देत ‘लोकल टू ग्लोबल’ हा संकल्प प्रत्यक्षात साकार होत असल्याचे आज स्पष्टपणे दिसून येत आहे.

Leave a Reply