धूळमुक्तमुळे कोपरगावमध्ये व्यवसाय वृद्धी होण्यास मदत – कृष्णा आढाव

कोपरगाव प्रतिनिधी, दि. २४ : धुळगाव अशी कोपरगावची ओळख निर्माण झाल्यामुळे कोपरगाव शहरातील छोट्या-मोठ्या व्यावसायिकांच्या व्यवसायाची पार वाट लागली होती. मात्र आ. आशुतोष काळे यांनी कोपरगाव शहरासाठी दिलेल्या भरमसाठ निधीमुळे कोपरगाव शहर धूळमुक्त झाले असून व्यवसाय वृद्धी होण्यास मोठी मदत झाली असल्याचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे युवक जिल्हाध्यक्ष कृष्णा आढाव यांनी म्हटले आहे.

आ. आशुतोष काळे यांनी कोपरगाव शहरवासियांना दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्यासाठी निवडून आल्यापासूनच अतिशय तत्परतेने कोपरगाव शहराचा पाणी प्रश्न सोडविण्यासाठी ५ नं.साठवण तलावाचे खोदाई कामास प्रारंभ करून सुरुवात केली होती. कोपरगाव शहराला धूळमुक्त करायचेच असा त्यांनी निश्चय केला होता. त्यामुळे कोपरगाव शहराचा पाणी, प्रश्न सोडवितांना कोपरगाव शहरातील रस्त्यांना देखील त्यांनी मोठ्या प्रमाणात निधी दिला आहे. त्यामुळे कोपरगाव शहरातील सर्वच प्रमुख रस्त्यांचा विकास झाला आहे.

 मागील काही वर्षापासून ज्या कृषी उत्पन्न बाजार समितीचा रस्ता खड्यात हरवला होता व सर्वत्र धुळीचे साम्राज्य होते त्या गोदावरी पेट्रोल पम्प ते गोकुळ नगरी रस्त्याला देखील निधी देवून नागरिकांची धुळीच्या व खड्ड्यांच्या रस्त्यातून कायमची मुक्तता केली आहे.  ग्रामीण भागातून कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आपला शेतमाल विक्रीसाठी घेवून येणाऱ्या हजारो शेतकऱ्यांची या रस्त्याने नियमितपणे ये-जा होती. त्यावेळी रस्त्याच्या दुतर्फा असणाऱ्या व्यावसायिकांना धुळीचा मोठा त्रास सहन  करावा लागत होता.

त्याची दखल घेवून आ. आशुतोष काळे यांनी या रस्त्याला निधी देवून या रस्त्याचे काम पूर्ण केल्यामुळे मागील काही वर्षापासून व्यावसायिकांना होणारा धुळीचा त्रास देखील कमी झाला आहे. त्याच बरोबर रस्ता चांगला झाल्यामुळे शेतकरी देखील या व्यावसायिकांकडून गरजेच्या वस्तू खरेदी करू लागले आहेत. त्यामुळे आ.आशुतोष काळे यांनी रस्त्यासाठी निधी दिल्यामुळे रस्त्याची दुर्दशा मिटली असून व्यवसाय वृद्धी होण्यास देखील मदत झाली असल्याचे कृष्णा आढाव यांनी म्हटले आहे