अजून किती बळी जाण्याची वाट पाहणार? – आमदार आशुतोष काळे

कोपरगाव प्रतिनिधी, दि. १७ : कोपरगाव शहरात मोकाट जनावरांचा वाढता वावर नागरिकांच्या जीवितासाठी गंभीर धोका ठरत असून, या जनावरांच्या अडथळ्यामुळे दोन निरपराध नागरिकांना आपला जीव गमवावा लागल्याच्या पार्श्वभूमीवर आमदार आशुतोष काळे यांनी सोमवार (दि.१७) रोजी कोपरगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अजित निकत यांच्यासमवेत बैठक घेतली. यावेळी मोकाट जनावरांच्या प्रश्नावर आमदार काळे यांनी तीव्र चिंता व्यक्त करत, अजून किती बळी जाण्याची वाट पाहणार? असा उद्विग्न सवाल करत नागरिकांच्या जीविताशी संबंधित हा प्रश्न आता गांभीर्याने हाताळा अशा सूचना केल्या.

कोपरगाव शहरातील प्रमुख रस्ते, चौक, बाजारपेठा तसेच शाळा-महाविद्यालयांच्या परिसरात मोकाट जनावरांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. रस्त्यांवर ठाण मांडून बसणारी जनावरे, अचानक वाहनांसमोर येणारे कळप आणि वाहतुकीला होणारा अडथळा यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या मोकाट जनावरांमुळे आतापर्यंत दोन नागरिकांना जीव गमवावा लागला असून अनेक नागरिक जखमी झाले आहेत.

नागरिकांच्या जीवित सुरक्षेशी तडजोड केली जाऊ शकत नाही. एखादी दुर्घटना घडल्यानंतर उपाययोजना करण्यापेक्षा दुर्घटना घडू नये यासाठी नगरपरिषद प्रशासनाने तत्काळ प्रभावी पावले उचलणे आवश्यक आहे, असे आमदार आशुतोष काळे यांनी स्पष्ट केले.

मोकाट जनावरांचा प्रश्न केवळ काही दिवसांपुरता न सोडवता त्यावर ठोस, प्रभावी आणि कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात याव्यात. शहरातील संवेदनशील ठिकाणे, प्रमुख रस्ते, बाजारपेठा आणि शैक्षणिक परिसरात विशेष लक्ष देऊन मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा. नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण करणारी परिस्थिती पुन्हा उद्भवू नये यासाठी आवश्यक ती सर्व कार्यवाही तातडीने करावी, अशा स्पष्ट सूचना आमदार आशुतोष काळे यांनी मुख्याधिकारी अजित निकत यांना दिल्या. नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देऊन मोकाट जनावरांच्या प्रश्नावर नगरपरिषद प्रशासनाने ठोस निर्णय घ्यावा अशा सूचना आमदार आशुतोष काळे यांनी यावेळी दिल्या.

Leave a Reply