आत्मा मालिक ध्यानपिठात भरला आयुर्वेदाचा महाकुंभमेळा

 देशभरातील हजारो आयुर्वेदाचार्य ३ दिवस कोपरगावात दाखल

कोपरगाव प्रतिनिधी दि. २२ : केंद्र सरकारच्या आयुष मंञालय आणि महाराष्ट्र आयुर्वेद संमेलनाच्या वतीने जागतीक किर्तीच्या हजारो  आयुर्वेदाचार्यासह विविध प्रकारच्या आयुर्वेदिक वनस्पती औषधांचा कुंभमेळा कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण येथील आत्मा मालिक ध्यानपिठात संपन्न होणार आहे. तिनदिवशीय या आयुर्वेद महासंमेलनाचे उद्घाटन शुक्रवारी २३ सप्टेंबर रोजी होणार असल्याची माहिती  महाराष्ट्र आयुर्वेद संमेलनाचे अध्यक्ष तथा राष्ट्रीय आयुर्वेदाचे महागुरु  डॉ. रामदास आव्हाड यांनी दिली. 

 तालुक्यातील आत्मा मालिक ध्यान तथा विश्वात्मक जंगली महाराज आश्रमाच्या प्रांगणात ओमगुरुदेव जंगलीदास माऊलींच्या सानिध्यात शुक्रवार पासुन रविवार २५ सप्टेंबर २०२२ पर्यंत आयुर्वेदाचा महाकुंभमेळा भरणार आहे. या आयुर्वेदिक महासंमेलनाच्या उद्घाटनाच्या अध्यक्षपदी पद्मभूषण व पद्मश्री डॉ. देवेंद्र ञिगुणा असणार आहेत.

या तिनदिवशीय महासंमेलनात ओमगुरुदेव जंगलीदास माऊलींसह, संत परमानंद महाराज संत निजानंद महाराज, संत विवेकानंद महाराज विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्टचे अध्यक्ष नंदकुमार सुर्यवंशी, केंद्रीय कमिशन बोर्डाचे अध्यक्ष डॉ. राकेश शर्मा, महाराष्ट्र आयुर्वेद महासंमेलनाचे अध्यक्ष डॉ.रामदास आव्हाड, शिर्डी साईबाबा संस्थानचे अध्यक्ष तथा आमदार आशुतोष काळे, खासदार सदाशिव लोखंडे, माजी आमदार स्नेहलता कोल्हे आयुर्वेदातील तज्ञ डॉ. शरद ठुबे, डॉ.सतिश भट्ट, डॉ. वैभव गवळी, डॉ. महेंद्र शिंदे, डॉ. प्रविण जोशी, डॉ. छोटेलाल यादव यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

देशपातळीवरील तिनदिवशीय आयुर्वेदिक संमेलनाबद्दल अधिक माहीती देताना डॉ. रामदास आव्हाड म्हणाले की, हे आयुर्वेदिक महा संमेलन असुन या संमेलनासाठी देशभरातील २ हजारापेक्षा अधिक आयुर्वेदिक तज्ञ डॉक्टर सहभागी होणार आहेत. आयुर्वेदाचे महत्त्व, माणसांची जीवन शैली, आहार विहार, वाढत्या रोगराईवर आयुर्वेदिक औषधांचे महत्त्व यावर विषेश मार्गदर्शन करणार आहेत. आयुर्वेदावर आधारीत शोध निबंधाचे सादरीकरण, चर्चासत्र, विविध तज्ञांचे व्याख्याने, मार्गदर्शन होणार आहेत.

घरोघरी आयुर्वेद या संकल्पनेवर विषेश चर्चासञ होणार आहे. शुक्रवारी सकाळी दहा वाजता या आयुर्वेदिक महासंमेलनाचे उद्घाटन होणार असुन पुढील तीन दिवस दररोज सकाळी दहा वाजता सुरु होणार दिवसभर विविध कार्यक्रम सायंकाळी ६ वाजे पर्यंत तर आयुर्वेदीक वनस्पतींचे व औषधांचे प्रदर्शन राञी १० वाजेपर्यंत सर्वांसाठी खुले राहणार आहे. हे आयुर्वेदिक संमेलन सर्वांसाठी खुले असल्याने राज्यातील नागरीकांना याचा लाभ घेता येणार आहे. अशी माहीती डॉ. रामदास आव्हाड यांनी दिली. 

दरम्यान आत्मा मालीक ध्यान पिठाच्यावतीने या राष्ट्रीय आयुर्वेदीक महा संमेलनाला विषेश सहकार्य करण्यात आले असुन नागरीकांच्या व सर्व भाविकांच्या हिताचे हे संमेलन असल्याने त्याचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन संत परमानंद महाराज यांनी ध्यान पिठाच्यावतीने केले आहे. आत्मा मालिक ध्यानपिठात आयुर्वेदिक महासंमेलनाची अद्यावत जय्यत तयारी करण्यात आल्याने जंगली महाराज आश्रमातील वातावरण आयुर्वेदिक झाले आहे.