अति पावसामुळे झालेल्या नुकसानीची सरसकट भरपाई मिळावी

शेवगाव प्रतिनिधी, दि. १२ : परतीच्या पावसाने  हाता-तोंडाशी आलेले शेतकऱ्याचे पीक वाया गेले आहे. विशेषतः शेवगाव तालुक्याचा पूर्व भाग कापसाचा आगार समजला जातो, परंतु वेचणीच्या तोंडाशी आलेला कापूस अति पावसामुळे वाया चालला आहे. तसेच तूर, बाजरी, सोयाबीन, मका आदी पिके व फळबागा यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. तथापि अद्यापही पावसाचा कहर चालूच आहे. त्यामुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्याला दिलासा देण्याकरिता शासनाने अतिवृष्टी झालेल्या गावात सरसकट नुकसान भरपाई देण्याची मागणी भारतीय जनता पार्टी व बाधीत गावातील नागरिकांनी निवेदनाद्वारे तहसीलदार यांना केली आहे.

सदर निवेदने तहसीलदार छगनराव वाघ,  गटविकास अधिकारी महेश डोके, तालुका कृषी अधिकारी अंकुश टकले यांना देण्यात आले. यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष ताराचंद लोढे, महाराष्ट्र प्रदेश भाजपा किसान मोर्चा सदस्य बापूसाहेब पाटेकर, ज्येष्ठ नेते बापूसाहेब भोसले,   अशोकराव आहुजा, सुनील रासने, कासम शेख, रवींद्र सुरवसे, अशोकराव खिळे, प्रा भाऊसाहेब मुरकुटे, संदीपराव देशमुख, पांडुरंग तहकीक, अंबादास ढाकणे, अशोकराव खिळे, लक्ष्मणआप्पा देवडे, राजेंद्र डमाळे, जलील राजे, सरपंच सुगंध खंडागळे, संतोष कंगनकर, बाळासाहेब हागे, रामेश्वर घुगे, सुरेशराव थोरात, संतोष कंगनकर, जयप्रकाश बागडे, पांडुरंग निंबाळकर, बाबासाहेब वाघुंबरे आदी उपस्थित होते.

शेतकऱ्याला मुख्यतः खरीप हंगामातील पिकावर आशा असते, परंतु कापणीला आलेले पीक वाया गेल्यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे. त्यामुळे पंचनाम्याचे निकष शिथिल करून अतिवृष्टी झालेल्या भागात सरसकट नुकसान भरपाई देण्याचा आग्रह प्रशासनाला यावेळी भाजपा पदाधिकारी, शेतकऱ्यांनी धरला यावेळी तहसीलदार  वाघ यांनी याकामी योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.