शासन आपल्या दारी’ अभियानाच्या धर्तीवर ‘ग्रामपंचायत आपल्या दारी’ उपक्रम राबवा -विवेक कोल्हे

कोपरगाव प्रतिनिधी, दि.१९ : शासनाच्या विविध योजनांचा गरजू लाभार्थ्यांना लाभ मिळवून देण्यासाठी तसेच प्रशासन अधिक लोकाभिमुख, पारदर्शक, कार्यक्षम आणि गतिमान होण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने राज्यभरात ‘शासन आपल्या दारी’ अभियान राबविण्यात येत आहे. ‘शासन आपल्या दारी’ अभियानाच्या धर्तीवर ‘ग्रामपंचायत आपल्या दारी’ हा उपक्रम राबविण्याची अभिनव संकल्पना सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष तथा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक, युवा नेते विवेक कोल्हे यांनी मांडली आहे. 

कोपरगाव तालुक्यात ‘शासन आपल्या दारी’ अभियानाच्या धर्तीवर ‘ग्रामपंचायत आपल्या दारी’ उपक्रम राबविण्यात यावा. या उपक्रमाच्या माध्यमातून ग्रामपंचायत पदाधिकारी, ग्रामसेवक, तलाठी यांनी ग्रामस्थांच्या थेट घरापर्यंत जाऊन ग्रामस्थांच्या समस्या जाणून घ्याव्यात व त्या समस्या सोडविण्यावर भर द्यावा, असे आवाहन युवा नेते विवेक कोल्हे यांनी केले आहे. विवेक कोल्हे म्हणाले, केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकार व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राज्यातील महायुतीच्या सरकारने सर्वसामान्य जनतेला केंद्रस्थानी ठेवून जनतेच्या हितासाठी अनेक योजना सुरू केल्या आहेत.

शासनाच्या वेगवेगळ्या योजनांचा गरजूंना लाभ मिळवून देण्यासाठी तसेच प्रशासन अधिक लोकाभिमुख, पारदर्शक, कार्यक्षम आणि गतिमान होण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून राज्यभरात ‘शासन आपल्या दारी’ अभियान राबविण्यात येत आहे. अहमदनगर जिल्हा स्तरावरील ‘शासन आपल्या दारी’ अभियान नुकतेच कोपरगाव तालुक्यातील काकडी येथे पार पडले. ‘शासन आपल्या दारी’ अभियानास नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. शासनाच्या वतीने गावच्या विकासासाठी विविध योजनांतर्गत ग्रामपंचायतला थेट निधी दिला जातो.

गावातील अनेक लोकांना शासनाच्या योजनांची माहिती नसते आणि माहितीअभावी या योजनांचा लाभ गरजू लोकांना मिळत नाही. शासनाच्या वैयक्तिक लाभाच्या व गाव विकासाच्या विविध योजना गावकऱ्यांपर्यंत पोहोचवून गरजूंना त्याचा लाभ देण्यासाठी तसेच ग्रामस्थांच्या समस्या व अडीअडचणी जाणून घेण्यासाठी ‘शासन आपल्या दारी’ अभियानाच्या धर्तीवर कोपरगाव तालुक्यातील ग्रामपंचायतींनी ‘ग्रामपंचायत आपल्या दारी’ हा उपक्रम राबविल्यास ग्रामस्थांना त्याचा फायदा होईल. 

गावकऱ्यांना पाणी, रस्ते, पथदिवे, स्वच्छता, सांडपाणी व कचरा व्यवस्थापन आदी प्रश्न सोडविण्यासाठी तसेच रहिवासी, जन्म-मृत्यू नोंद व इतर विविध प्रकारचे दाखले मिळवण्यासाठी व अन्य कामांसाठी ग्रामपंचायत कार्यालयात हेलपाटे घालावे लागतात. विविध प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी पाठपुरावा करावा लागतो. जर ‘ग्रामपंचायत आपल्या दारी’ उपक्रमाच्या माध्यमातून सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, तलाठी व ग्रामपंचायतचे कर्मचारी यांनी प्रत्यक्ष गावकऱ्यांपर्यंत जाऊन त्यांचे प्रश्न व समस्या जाणून घेऊन लगेचच मार्गी लावल्या तर गावकऱ्यांचे श्रम, पैसा आणि वेळेची बचत होईल. गावकऱ्यांचे प्रश्न त्वरित सुटले तर त्यांना मोठा दिलासा मिळू शकेल, असे मत त्यांनी व्यक्त केले. 

‘शासन आपल्या दारी’ अभियानाच्या माध्यमातून प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी थेट नागरिकांपर्यंत जाऊन त्यांना भेडसावणाऱ्या विविध समस्या सोडविण्याबरोबर शासनाच्या विविध योजनांचा लाभ गरजू लाभार्थ्यांना देत आहेत. याच अभियानाच्या धर्तीवर कोपरगाव तालुक्यात ‘ग्रामपंचायत आपल्या दारी’ उपक्रम राबवून सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, तलाठी व ग्रामपंचायतचे कर्मचारी यांनी गावातील प्रत्येक वॉर्डात, वाड्या, वस्त्यावर थेट जाऊन लोकांच्या समस्या जाणून घ्याव्यात.

या उपक्रमातून गावकऱ्यांच्या समस्या सोडविण्यावर भर द्यावा. ग्रामपंचायत पातळीवर गावकऱ्यांच्या समस्यांचे निराकरण करणे शक्य नसेल तर पंचायत समिती, जिल्हा परिषद प्रशासनाकडे व राज्य शासनाकडे गावकऱ्यांच्या समस्या मांडून त्या सोडविण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन विवेक कोल्हे यांनी केले आहे.