खडकी रहिवासीयांच्या उपोषणाची मुख्याधिकारी व तहसिलदारांनी घेतली दखल 

कोपरगाव प्रतिनिधी, दि.१२ :  शहरातील जुना टाकळी नाका ते खडकी हा रस्ता रहदारीचा अत्यंत महत्त्वाचा आहे. मात्र, त्यास मोठया प्रमाणात खडडे पडल्याने, त्याची तात्काळ दुरुस्ती करावी, या मागणीचे निवेदने खडकी प्रभागातील रहिवासीयांनी अनेकवेळा दिले होते. मात्र, न्याय मिळत नसल्याने शेवटी येथील रहिवासी उपोषणास बसले होते. त्याची दखल मुख्याधिकारी शांताराम गोसावी व नायब तहसिलदार विकास गवरे यांनी घेतली. 

सदर रस्ता दुरूस्तीचे काम कोपरगांव सार्वजनिक बांधकाम विभागाच्यावतीने तातडीने सुरू करून त्यावरील खड्डेही बुजविले जातील व माउली अँग्रो ते खडकी रस्ता कामाचा प्रस्ताव शासनस्तरावर पाठविण्यात आला असुन, त्यास अनुदान प्राप्त होताच त्याचेही काम प्राधान्याने हाती घेवु असे आश्वासन मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांनी दिल्याने उपोषणकर्त्यांनी आपले उपोषण मागे घेतले. त्याचप्रमाणे अयोध्यानगरी भागात पिण्याच्या पाण्याची पाईपलाईनचेही काम सुरू करण्यात येईल.

प्रारंभी माजी नगरसेविका ताराबाई जपे यांनी येथील पार्श्वभूमी सांगुन दैनंदिन सुविधापासुन खडकी प्रभाग कसा वंचित आहे व त्यासाठी आपण पालिकास्तरावर प्रत्येक मासिक बैठकीत केलेल्या पाठपुराव्याची माहिती दिली. अमृत संजीवनीचे अध्यक्ष पराग संधान म्हणाले की, माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी खडकी व अयोध्यानगरी रहिवासीयांच्या भावना लक्षात घेवुन त्याबाबत जिल्हाधिकारी अहमदनगर यांच्यास्तरावर पाठपुरावा सुरू केला आहे.

 उपोषणकर्त्यांनी प्रभाग १ व २ अंतर्गत खडकी भाग, जुना टाकळी नाका, समतानगर, साईसिटी, शिंगी शिंदे नगर, वृदावननगर या परिसरातही मुलभूत सुविचाचा अभाव आहे. त्याकडे पालिका प्रशासनाने वेळीच लक्ष देवुन त्याची सोडवणुक करावी असे सांगितले. नायब तहसिलदार विकास गंबरे यांनी खडकी अतिवृष्टीबाधितांना नुकसान भरपाई मिळण्याबाबतच्या सर्व प्रस्तावाची पुर्तता करून त्यास निधी प्राप्त होताच या संबंधीतांच्या खात्यात भरपाईची रक्कम जमा केली जाईल असे आश्वासन दिले. कोपरगाव सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी राउत यावेळी उपस्थित होते. दिपक जपे यांनी आभार मानले.