ज्यांचे शेतकऱ्यांवर लक्ष, तोच आपला पक्ष- विवेक कोल्हे

याची-त्याची जिरवण्यापेक्षा पाणी जिरवा

कोपरगाव प्रतिनिधी, दि.१० : नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत विजयी झालेल्या राहता तालुक्यातील नवनिर्वाचित सरपंच आणि सदस्य यांचा सत्कार सोहळा कोल्हे कारखान्याचे चेअरमन युवानेते विवेक कोल्हे व मान्यवरांच्या शुभहस्ते साई विठ्ठला लॉन्स राहता येथे पार पडला. या प्रसंगी बोलताना विवेक कोल्हे म्हणाले की, ग्रामपंचायत ही ग्रामीण विकासाचे केंद्र आहे. निवडणुका संपल्या की राजकारण संपले पाहिजे. विरोधाला विरोध करून काम करणे ही आमची पद्धत नाही.

यापूर्वी देखील संस्था हित बघून श्री गणेश कारखाना निवडणुकीत तुम्ही हाक दिली, त्याला आम्ही प्रतिसाद दिला. तसेच आगामी काळात देखील ज्या ज्या निवडणूक येतील त्यात खंबीरपणे तुमच्या सोबत उभे राहू. पुणतांबा, वाकडी, चितळी या मोठ्या ग्रामपंचायत जिंकून जनतेचा कौल स्पष्ट झाला आहे. जे सदस्य विजयी झाले. त्यासह जे कोणत्याही दबावाला बळी न पडता लढले ही खरी ताकद आहे.

सहकार हितासाठी माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली आपण गणेश कारखाना निवडणूक लढलो आणि आता कारखाना सुरू झाला. अनेक अडचणी त्यात आल्या मात्र, मार्ग निघाला. येत्या काळात पाणी प्रश्न भेडसावणार असून न्यायालयीन लढाई कोल्हे कारखाना लढतो आहे. मात्र, जर न्याय मिळाला नाही. तर, आपल्याला रस्त्यावरची लढाई देखील लढावी लागेल. यासाठी उपस्थितांनी हात उंचावून होकाराचा एल्गार केला.

आगामी काळात कोपरगाव विधानसभा मतदारसंघ पुन्हा विजयी होऊन नागरिकांचे ज्वलंत प्रश्न सोडवण्यासाठी कोल्हे कुटुंब तयार आहे. असे विवेक कोल्हे यांनी या प्रसंगी सूचित केले आहे.

मतदान केले नाही म्हणून रस्ता अडवणे, डी.पी अडवणे, विकास कामे रखडवणे ही पद्धत योग्य नाही. जर विरोध करून कोणी राजकरण केले. तर, आपणही अरे ला कारे करू शकतो आणि राजकारणाचे उत्तर राजकारणाने देऊ शकतो. आगामी काळात आपली भूमिका शेतकरी हितासाठी आग्रही असून ज्यांचे शेतकऱ्यांवर लक्ष तो आपला पक्ष हे धोरण आहे.

रोटी, कपडा और मकान या गरजा पूर्ण झाल्या तरी रस्ते, पाणी आणि वीज या गोष्टी गावच्या विकास होण्यात मोलाच्या असतात त्यावर लक्ष देणे आवश्यक आहे. घरकुल योजना, वित्त आयोग, विशेष निधी यावर भर देऊन गावचे नंदनवन करने गरजेचे आहे. माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी शेती महामंडळाच्या जमिनी पाणी पुरवठा योजनेला मिळाव्या यासाठी पुणतांबा रस्तापुरचा प्रश्न विधानसभेत लाऊन धरला होता. त्यामुळे संपूर्ण राज्यात निर्णय होऊन अनेक पाणीपुरवठा योजना मार्गी लागल्या. यासह विविध विषयावर समाचार घेत चौफेर फटकेबाजी विवेक कोल्हे यांनी केली.

गणेश कारखाना व्हा.चेअरमन विजय दंडवते, गंगाधर चौधरी, शिवाजी लहारे, धनंजय जाधव, रामचंद्र बोठे, भाऊसाहेब चौधरी, सर्जेराव जाधव, ॲड.नाईक भाऊसाहेब, विक्रम वाघ, संजय शेळके, भाऊसाहेब थेटे, विजय फोफसे, संजय सरोदे, डॉ. जेजुरकर, उत्तम मते, धनंजय गाडेकर, डॉ.वसंत लभडे, विलास टिळेकर, दादाभाऊ सांभारे, राजेंद्र बाभुळके, बाळासाहेब वाघ, राजेंद्र काळे, भानुदास कातोरे, रामभाऊ बोरबने, जी.बी.घोरपडे, दिलीप क्षीरसागर, वाल्मीक तुरकने, बबन काळे, सुभाष सांभारे आदीसह राहता तालुक्यातील विविध आजी माजी पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामपंचायतचे सदस्य आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.