जायकवाडी पाणी प्रश्नावर १२ डिसेंबरला सुनावणी – विवेक कोल्हे

कोपरगाव प्रतिनिधी, दि.२२ : नगर-नाशिक विरुद्ध मराठवाडा हा पाणी संघर्ष दिवसेंदिवस तीव्र होत आहे. दुष्काळजन्य परिस्थिती असल्याने आमचे हक्काचे पाणी मराठवाड्याला सोडून नगर-नाशिकवर अन्याय करू नये. यासाठी संजीवनी उद्योग समूहाने सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली. जेष्ठ अनुभवी वकील ॲड. कपिल सिब्बल यांनी संजीवनीच्या याचिकेची बाजू मांडली आहे.

त्यानुसार सर्वोच्च न्यायालयाने आगामी १२ डिसेंबर रोजी पुढील सुनावणी ठेवली असून म्हणणे ऐकून घेतले जाणार आहे. यासह आगामी तारखेची सुनावणी पूर्ण होऊ पर्यंत पाणी सोडले जाऊ नये. यासाठी शासनालाही आपण विनंती केल्याची माहिती कोल्हे कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांनी दिली आहे.

ॲड. कपिल सिब्बल व त्यांच्या सर्व विधितज्ञांसोबत बाजू मांडण्यासाठी आवश्यक माहितीवर विवेक कोल्हे यांनी स्वतः दिल्ली येथे उपस्थित राहून चर्चा केली. समन्यायी पाणी वाटप कायद्याने नगर-नाशिकचे हक्काचे पाणी विभागले गेले व जायकवाडीला पाणी सोडले जाण्याचा निर्णय लादला गेला. २०१६ साली एम डब्ल्यू.आर.आर.ए ने दिलेल्या सूचना मान्य नसल्याने संजीवनी उद्योग समूहाने हायकोर्टात दाद मागितली, त्यावर २०१७ मध्ये आदेश झाले होते.

पुन्हा पाणी जायकवाडीला सोडले जाणार असल्याची प्रक्रिया सुरू झाल्याने सर्वोच्च न्यायालयात संजीवनीने सर्वप्रथम विशेष याचिका दाखल केली. कालांतराने इतर कारखाने देखील सहभागी झाले. संजीवनीच्या पाणी सोडण्याच्या निर्णया विरोधातील हस्तक्षेप याचिकेवर दि.२१ नोव्हेंबर २०२३ रोजी सुनावणी झाली व १२ डिसेंबर २०२३ हि तारीख पुढील सुनावणीसाठी मिळाली आहे.

सर्वोच्च न्यायालयात आगामी सुनावणी होऊ पर्यंत सरकारने येत्या १२ डिसेंबर पर्यंत कोणताही निर्णय पाणी सोडण्याबाबत घेऊ नये. यासाठी कोल्हे यांनी शासनाला देखील विनंती केली आहे. याप्रसंगी सर्वोच्च न्यायालयात सुनावनीवेळी ज्येष्ठ वकील ॲड.एम. वाय. देशमुख, वरिष्ठ वकील अन्सारी आदींसह इतर ज्येष्ठ अभ्यासू वकील यांच्यासमवेत विवेक कोल्हे उपस्थित होते.