ताजनापुर योजनेचे काम शिघ्र गतीने चालू – आमदार राजळे

शेवगाव प्रतिनिधी, दि.०४ : दीर्घ काळ रेंगाळलेल्या ताजनापुर योजनेचे काम मार्गी लागले असुन उर्वरित काम सुद्धा शिघ्र गतीने चालू आहे. जायकवाडी जलाशयात आपले राखीव असलेले सर्व पाणी तालुक्यालाच मिळावे ही आपली भूमिका असून ते सर्व आपण उचलणार असल्याची ग्वाही देऊन केवळ निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन उर्वरीत गावांचे राजकारण केले जात आहे. लोकांत संभ्रम निर्माण व्हावा असे काहीचे प्रयत्न असल्याची टीका आमदार मोनिका राजळे यांनी केली.

तालुक्यातील खरडगाव सुसरे यांना जोडणाऱ्या नांदनी नदीवर ३ कोटी ६८ लाख रुपये खर्चाच्या पुलांचे बांधकाम व ४ कोटी ९१ लाख खर्चाच्या लखमापुरी प्रभुवाडगाव ते मडका रस्ता डांबरीकरण कामांचा भुमिपुजन समारंभ आमदार राजळे यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष ताराचंद लोढे, कृषक समाजाचे राज्याध्यक्ष बापुसाहेब भोसले, भिमराज सागडे, बापुसाहेब पाटेकर, तुषार पुरनाळे, शिवकन्या लबडे, श्रीकांत मिसाळ, डॉ.प्रल्हाद लवांडे, बबन लबडे, ज्ञानेश्वर बोडखे, संतोष बोडखे, प्रविण गायकवाड, वरुर सरपंच सचिन म्हस्के, दादासाहेब कंठाळी, गोविंद ठोंबरे, प्रभारी गटविकास अधिकारी सुरेश पाटेकर, उपविभागीय अभियंता प्रल्हाद पाठक, शाखा अभियंता राठोड, सुरेश घुले उपस्थित होते.

आ.राजळे म्हणाल्या, आपण गावची गरज ओळखून विकास कामे केली आहेत. आपले शासन आल्याने दिड दोन वर्षात मोठा निधी प्राप्त झाला. २०१९ मध्ये भरपुर पाऊस झाल्याने रस्ते बिकट झाले होते. मात्र, शिंदे फडणवीस शासन येताच या रस्त्यांसाठी ७५ कोटी रुपयांचा निधी मिळाला. शेवगाव पाथर्डीत मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून ५० किलोमीटरचे रस्ते पूर्ण झाले असून २५ किलोमीटर रस्त्यांना मंजुरी मिळाली आहे.

रस्ते दर्जेदार होत नाही असा विरोधक अपप्रचार करतात. याबाबत त्यांनी क्वालीटी कंट्रोलकडे अर्ज करावा त्यात जे दोषी आढळतील त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी मी स्वत: करेन. दर्जेदार काम होत नसेल तर कोणाचीही गय केली जाणार नाही. असा इशारा ही त्यांनी दिला. ग्रामस्थ व कार्यकर्त्यानी देखील होणाऱ्या कामाच्या गुणवतेवर लक्ष द्यावे अशा सुचना केल्या. 

कित्येक वर्षापासुन आपण ताजनापुर योजना ऐकतो आता प्रत्यक्षात पाणी पाहण्याचे समाधान मिळाले आहे. या योजनेस ३० ते ३५ कोटी रुपयांचा निधी आला. आणखीही निधीची मागणी केली आहे. जी योजना ज्या गावांसाठी आहे ती पूर्ण व्हावी हा आपला हेतु आहे. नंतर इतर गावांचा समावेश होऊन राखीव पाणी मिळावे. उर्वरीत गावांचे राजकारण केले जाते, नारळ फोडले जातात. सध्या जो सर्वे सुरु आहे त्यास काही कालावधी लागणार आहे. पंरतु निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन असे राजकारण करू नये.

कारण त्यामुळे जनतेत संभ्रम निर्माण होतो. निवडणुकीत कोणत्या गावातुन किती मते पडली याचा विचार न करता आपण विकास कामे केली आहेत. हे स्पष्ट करून आगामी निवडणुकीत विकास कामांवर सहकार्य करण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. येत्या २२ तारखेला आयोध्यामध्ये प्रभू रामचंद्राची  मूर्ती प्रतिष्ठापना उत्सव होत असून त्याच्या अक्षदा आपणास पोहच  होत आहेत. या दिवशी आपण घरोघरी हा उत्सव दिवाळी सारखा मोठ्या उत्साहात साजरा करावा. असे आवाहनही आमदार राजळे यांनी शेवटी केले.