भारतीय कम्युनिस्ट पक्षाची शरद पवारांकडे मागणी

शेवगाव प्रतिनिधी, दि. ०९ : भाजपचा पराभव करण्यासाठी महाराष्ट्रातील इंडिया आघाडीतील सर्व घटक पक्षांची भक्कम एकजूट हवी. तसेच राज्यात  आघाडीचे उमेदवार निवडून आणण्यासाठी एकत्रित रणनिती आखणे गरजेचे आहे. त्यासाठी सर्व घटक पक्षांची तातडीने मिटिंग घ्यावी, अशी मागणी भारतीय कम्युनिस्ट पक्षाने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे केली आहे.  

भाकपच्या शिष्टमंडळाने सोमवारी (दि.८) पवार यांची समक्ष भेट घेऊन मागणी केली. शिष्टमंडळात भाजपचे राज्य सेक्रेटरी कॉ. ॲड सुभाष लांडे, राज्य सचिव मंडळ सदस्य कॉ. प्रकाश रेड्डी, मुंबई सेक्रेटरी कॉ. मिलिंद रानडे व राज्य कार्यकारी सदस्य कॉ. अशोक सुर्यवंशी यांचा सहभाग होता. या वेळी दिलेल्या पत्रात टले आहे की, भाजपचा पराभव करण्यासाठी इंडिया आघाडीची स्थापना करण्यात आली आहे. भारतीय कम्युनिस्ट पक्ष या आघाडीतील महत्वाचा घटक पक्ष आहे.

लोकसभेच्या निवडणुका तोंडावर आलेल्या असताना महाराष्ट्रातील इंडिया आघाडीतील सर्व घटक पक्षांची एकत्रित मिटिंग घेऊन भाजपचा पराभव करण्यासाठी आघाडीतील इतर सर्व पक्षांशी विचारविनिमय होणे आवश्यक आहे. महाराष्ट्रात भाजपने परभणीतून कॉ. राजन क्षीरसागर व शिर्डीतून कॉ. ॲड बन्सी सातपुते यांचे नाव निश्चित केले आहे.

भाजपचा पराभव करून राज्यात इंडिया आघाडीचे उमेदवार निवडून आणण्यासाठी एकत्रित रणनीती आखली पाहिजे. आघाडीतील सर्व पक्ष मिळून भाजपचा पराभव करू शकतात असा संदेश जनतेपर्यंत जाणे आवश्यक आहे. अशी मागणी या पत्राद्वारे पवारांकडे करण्यात आली आहे. यावेळी पवार यांनी आठवड्याभरात राज्यातील इंडिया आघाडीतील घटकपक्षांची बैठक बोलावण्यात येणार असल्याचे सांगून, या बैठकीला अन्य डाव्या पक्षांना निमंत्रण देणार असल्याचे सांगितले. यावेळी देशातील व राज्यातील राजकीय परिस्थितीवरही विस्ताराने चर्चा करण्यात आली.