गोदाकाठ महोत्सवामुळे स्थानिक बाजार पेठेला मिळाली चालना

कोपरगाव प्रतिनिधी, दि.०९ : महात्मा गांधी जिल्हा प्रदर्शन चॅरिटेबल ट्रस्ट व प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळ आयोजित ‘गोदाकाठ महोत्सव २०२४’ च्या तिसऱ्या दिवशी रविवार सुट्टीचा दिवस असल्यामुळे कोपरगावकरांची गोदाकाठ महोत्सवात खरेदीसाठी मोठी झुंबड उडाली असल्याचे चित्र पहायला मिळाले. यावेळी गोदाकाठ महोत्सवाकडे येणारे सर्वच रस्ते गर्दीने फुलल्यामुळे नागरिकांची मोठी गर्दी होवून स्थानिक बाजारपेठेला देखील चालना मिळाली.

हस्तकला, बचत गटांच्या महिलांनी तयार केलेली विविध उत्पादने, आणि खाद्य पदार्थांची रेलचेल हे सारं काही गोदाकाठ महोत्सवात अनुभवता येत असल्यामुळे गोदाकाठ महोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी झालेल्या अफाट गर्दीमुळे आणलेला माल संपल्यामुळे बचत गटाच्या महिलांना पुन्हा माल आणावा लागला. रात्री उशिरापर्यंत नागरिकांनी कुटुंबियांसोबत या महोत्सवाला भेट देऊन आनंद लुटला.

मनमुराद खरेदी करून, खाद्यपदार्थांच्या स्टॉलवर गर्दी होत होती. कॅशलेस व्यवहार मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे रोखीचे व्यवहार कमी झाल्याची जाणीव बचत गटातील महिलांना झाल्यामुळे प्रत्येक बचत गटाच्या स्टॉल्सवर रोखीपेक्षा फोन पे, गुगल पे आदी कॅशलेस व्यवहार होत असल्याचे दिसून आले. त्यामुळे गोदाकाठ महोत्सवाने महिलांना आर्थिकदृष्ट्या निर्भर करण्याबरोबरच महिला आधुनिक देखील केल्यामुळे सुट्या पैशांसह रोख रक्कम सांभाळण्याचा ग्राहक महिलांचा त्रास देखील कमी झाला असल्याचे दिसून येत होते.

२० कोटीचा भार उतरविल्याबद्दल महिला मंडळांनी केला आ. आशुतोष काळेंचा सत्कार – आ. आशुतोष काळे यांनी पाणी प्रश्न सोडविण्याचा दिलेला शब्द पूर्ण करतांना १३१.२४ कोटी निधी ५ नंबर साठवण तलावासाठी दिला आहे. हे काम प्रगतीपथावर असून त्यामुळे लवकरच पिण्याच्या पाण्याचा महिला भगिनींचा अत्यंत जिव्हाळ्याचा प्रश्न सुटणार आहे. त्याचबरोबर १३१.२४ कोटी निधीच्या १५ टक्के रक्कम म्हणजेच २० कोटी रुपये रक्कम देखील राज्यशासनाकडून मिळवून कोपरगावकरांचा २० कोटीचा भार उतरविल्याबद्दल महिला मंडळानी कोपरगावकरांच्या वतीने आ. आशुतोष काळे यांचा सत्कार केला.

गौतम बँकेच्या माजी संचालिका व प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळाच्या अध्यक्षा पुष्पा काळे, आ. आशुतोष काळे व जिल्हा सहकारी बँकेच्या माजी संचालिका चैताली काळे यांनी देखील विविध स्टॉलवर जावून खरेदीचा आनंद लुटला. यावेळी त्यांनी सर्वच बचत गटाच्या स्टॉलधारकांची आपुलकीने विचारपूस करून व्यवसायाची माहिती जाणून घेतली असता गोदाकाठ महोत्सव सुरु झाल्यापासून सलग दहा वर्षापासून येणाऱ्या बचत गटाच्या अनेक महिलांनी मागील चार वर्षापूर्वीचे कोपरगाव व आताचे कोपरगाव यामध्ये विकासाच्या बाबतीत अमुलाग्र बदल झाला असल्याचे सांगत रस्त्यावरील खड्डे गायब झाल्यामुळे खरेदीसाठी नागरिक मोठ्या प्रमाणात येत आहे.

त्यामुळे या चार वर्षात व्यवसायात वर्षागणिक वाढ होत असल्याचे सांगितले. चार दिवसांचे अत्यल्प दरात मिळणारे स्टॉल व याठिकाणी मिळणाऱ्या सोयी सुविधा बाबतीत देखील समाधान व्यक्त केले. यावेळी कोपरगाव मतदारसंघातील बूथ लेव्हल ऑफिसर (BLO), प्रगत शेतकरी व विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल पुरस्कार मिळविलेल्या कोपरगावच्या भूमीपुत्रांचा गौतम सहकारी बँकेच्या माजी संचालिका व प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळाच्या अध्यक्षा पुष्पा काळे, आ. आशुतोष काळे, जिल्हा बँकेच्या माजी संचालिका चैताली काळे व महात्मा गांधी जिल्हा प्रदर्शन चॅरिटेबल ट्रस्टचे विश्वस्त यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.