शेवगाव प्रतिनिधी, दि.२० : केंद्र व राज्य शासनाच्या विविध लाभांच्या योजनांचा लाभ मिळावा यासाठी तहसील सह विविध शासकीय कार्यालयात लोकांची गर्दी वाढली आहे. त्यातून मार्ग काढण्यासाठी ‘शासन आपल्या दारी’ हा उपक्रम राबविला जात आहे, त्यात लाभार्थीच्या शासकीय कार्यालयातील चकरा कमी करून त्याच्या सोयीच्या ठिकाणी एकाच छताखाली विविध अडचणी सोडविल्या जात आहेत. मतदार संघात सर्वत्र व शहरांच्या सर्वच प्रभागात ‘शासन आपल्या दारी’ या उपक्रमाची कसोशीने अंमलबजावणी करून जनतेला न्याय देण्यात येत असल्याची ग्वाही आमदार राजळे यांनी दिली.
शेवगाव शहरातील बालाजी मंदिरात प्रभाग क्रमांक सहा मधील नागरिकांसाठी आयोजित करण्यात आलेल्या शासन आपल्या दारी उपक्रमान्तर्गत आयोजित विविध कार्यक्रमान त्या बोलत होत्या. यावेळी आ. राजळे यांनी, स्थानिक तहसील कार्यालयात अनेक जागा रिक्त असल्याने कामे मार्गी लावण्यात उशीर होतो. म्हणून शेवगाव पाथर्डी तहसील कार्यालयातील रिक्त जागा तातडीने भरण्या बाबत राज्याचे महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांचे लक्ष वेधले असल्याचे नमुद करून त्या म्हणाल्या, अशा कार्यक्रमातून लोकांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यास मदत मिळते.
तेव्हा प्रत्येक प्रभागातील क्रिया शिल कार्यकर्त्यांनी पुढाकार घेऊन उपस्थितांच्या संख्येनुसार दोनतीन दिवसीय शिबीरे घेतली तर अनेकांच्या प्रश्नांना न्याय मिळू शकतो. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाच्या शिवसेना युवा संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष साईनाथ आधाट, तालुका प्रमुख आशुतोष डहाळे यांनी पुढाकार घेऊन आयोजित केलेला हा उपक्रम इतरांना देखील प्रेरणादायी असल्याचे त्या म्हणाल्या.
यावेळी जेष्ठ नागरिक संघटनेचे राधेश्याम तिवारी यांचेही भाषण झाले. या शिबीरात आयुष्यमान भारत आरोग्य कार्ड, रेशन कार्ड व आधार कार्ड दुरुस्ती, रेशनकार्डमधील नाव कमी करणे, घरकुल योजना याशिवाय शासनाच्या संजय गांधी निराधार व स्वावलंबन योजनेसाठी नवीन अर्ज, पीएम किसान योजनेतील अडचणी आदि शासकीय लाभांच्या योजनेच्या अडचणी सोडविण्याची पूर्तता करण्यात आली. दुपार अखेर सातशेच्या वर स्त्री पुरुषांनी त्याचा लाभ घेतला.
ज्येष्ठ नेते बापूसाहेब पाटेकर, उपमुख्यमंत्री अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी युवक संघटनेचे जिल्हाध्यक्ष नंदकिशोर मुंढे, मनसेचे ताकुकाध्यक्ष गणेश राधवणे माजी नगरसेवक सागर फडके, प्रा.नितीन मालानी, राहुल बंब, प्रकाश लड्डा, मनोज कांबळे, अविनाश पुरोहित, अमोल माने, प्रकाश लड्डा, रामदयाळ लाहोटी, राजकुमार तिवारी, जुगलकिशोर बाहेती, वसुधा सावरकर, भारती बाहेती, अलका म्हस्के यांचे सह प्रभागातील नागरिक उपस्थित होते. दिपक कुसळकर यांनी सुत्रसंचलन केले. डहाळे यांनी आभार मानले.