विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी संजीवनी कटीबध्द – स्नेहलता कोल्हे


कोपरगाव प्रतिनिधी, दि.०६ :  आजी आजोबा, आई वडील या सर्वांनाच आपल्या पाल्यांच्या यशाबध्दल कौतुक असते. संजीवनीच्या विविध संस्थांमध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांचा, त्यांच्या पालकांचा आणि संबंधित मिळुन संजीवनी हा मोठा परीवार आहे. जसे पालकांना त्यांच्या पाल्यांच्या यशाचे  कौतुक असते, तसे संजीवनी परीवार म्हणुन आम्हालाही त्यांचा अभिमान वाटतो.

संजीवनी अकॅडमी, कोपरगाव व संजीवनी इंटरनॅशनल स्कूल, शिर्डीच्या विद्यार्थ्यांनी आयआयटी बाम्बेच्या आयआयटी टेक फेस्ट या तांत्रिक स्पर्धेत शालेय तसेच अभियांत्रिकी या वर्गवारींमध्ये भारतातील शाळांमधून सर्वात जास्त बक्षिसे जिंकुन आसिया खंडात सर्वात मोठी स्पर्धा असणाऱ्या स्पर्धेत मध्ये विजयी झेंडा फडकविला, ही बाब स्व. शंकरराव कोल्हे यांची स्वप्न पुर्ती आहे.

विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी संजीवनी परीवार नेहमीच कटीबध्द असतो ही या यशाची पुष्टी आहे, असे प्रतिपादन माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी केले. संजीवनी अकॅडमी व संजीवनी इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी आयआयटी बॉम्बे मधिल आंतरराष्ट्रीय पातळीवरील विविध स्पर्धांमध्ये तसेच इतर स्पर्धांमध्ये मिळविलेल्या उत्तुंग यशाबध्दल त्यांचा व त्यांच्या पालकांचा संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या भव्य सोलर पार्कमध्ये गौरव सोहळा साजरा करण्यात आला.

यावेळी प्रमुख अतिथी म्हणुन कोल्हे बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर विशेष अतिथी म्हणुन शिर्डी विभागाचे पोलिस उपअधिक्षक शिरीष वामने, संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे, संजीवनी ग्रुप ऑफ स्कूल्सच्या संचालिका डॉ. मनाली कोल्हे, प्रिन्सिपल डायरेक्टर अशोक जैन, प्राचार्या सुंदरी सुब्रमण्यम, प्राचार्या शैला दुबे, आदी उपस्थित होते. यावेळी विद्यार्थीनी राजविका कोल्हे हीने आयआयटी मधिल तर विद्यार्थी पार्थ गांगुर्डे याने दिल्ली येथिल अनुभव अस्खलित इंग्रजी मधुन कथन करीत उपस्थितांची वाहवा मिळविली.

डीवायएसपी वामने म्हणाले की, पालकांनी पाल्यांच्या क्षमता ओळखुन त्यांना विकसीत करावे. सध्या स्पर्धा वाढल्या असुन केवळ शैक्षणिक गुणवत्ता पुरेशी नसुन इतर कौशल्येही महत्वाचे आहेत. त्यादृष्टीने संजीवनी मधिल विविध उपक्रम स्तुत्य आहेत. मी व्हीआयटी, पुणेच्या अभियांत्रिकीचा विद्यार्थी असुन त्यावेळी मी जे पाहत होतो, त्याही पेक्षा सरस तांत्रिक सादरीकरण संजीवनीच्या शालेय विद्यार्थ्यांनी करून दाखवित आयआयटी बॉम्बकडून त्यांची प्रतिभा संपन्नता सिध्द करून घेतली.

यावेळी संचालिका डॉ. मनाली कोल्हे यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत केले व संजीवनी अकॅडमी आणि संजीवनी इंटरनॅशनल स्कूलच्या राष्ट्रीय आणि आंतराष्ट्रीय उपलब्धींबाबत माहिती दिली. यात त्यांनी सांगीतले की आयआयटी बॉम्बेच्या वतीने आसिया खंडातील सर्वात मोठी आयआयटी टेक फेस्ट ही तांत्रिक स्पर्धा घेण्यात येते. यात शालेय व अभियांत्रिकी क्षेत्रातील विद्यार्थ्यांचा सहभाग असतो. यात मेकॅन्झो लिग या स्पर्धा प्रकारात पहिला, दुसरा व तिसराही क्रमांक मिळवुन आपल्या प्रतिभा संपन्नतेचे व कौशल्यांचे दर्शन घडविले.

यात प्रथम क्रमांकाचे रू २५,००० रोख बक्षिस, इस्त्रोची सहल व रू १५,००० ची स्टेम स्कॉलरशिप मिळविली. दुसऱ्या क्रमांकाच्या बक्षिसाचे स्वरूप रू १०,००० रोख व रु १५,००० ची स्टेम स्कसॅलरशिप होती तर याच स्पर्धेत तिसऱ्या क्रमांकाचे स्वरूप रू ५००० रोख व रोबोटिक्स किट असे होते. रोबोरेस या स्पर्धा प्रकारात दुसऱ्या क्रमांकाचे रू ३०,००० चे रोख बक्षिस जिंकले.

तसेच काझ्मोक्लेंच या फक्त अभियांत्रिकी स्पर्धा प्रकारात देखिल सहभाग नोंदवुन विजेते ठरले. स्मार्ट किड अबॅकस लर्निंग, पुणे या संस्थेने १३ व्या राष्ट्रीय व ६ व्या आंतरराष्ट्रीय अबॅकस स्पर्धेत संजीवनीच्या विद्यार्थ्यांनी २ रा व ३ रा क्रमांक पटकाविला. तसेच राष्ट्रीय य बेसबॉल व सॉफ्ट बॉल स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या संघातुन एकुण ६ खेळाडूंची निवड झाल्याचे डॉ. कोल्हे यांनी सांगीतले.

स्नेहलता कोल्हे पालकांना उदे्दशून पुढे म्हणाल्या की, आपल्या पाल्याला किती टक्के गुण मिळाले याही पेक्षा तो किती उपक्रमांमध्ये भाग घेतो हे महत्वाचे आहे. पाल्यांनी मनात जिध्द, चिकाटी व प्रचंड महत्वाकांक्षा ठेवत पुढे जावे. यावेळी एकुण ३१ गुणवंत विद्यार्थी व त्यांच्या भाग्यवान पालकांचा यथोचित सत्कार करण्यात आला. तसेच विद्यार्थ्यांचे मार्गदर्शक प्रा. आदित्य गायकवाड, विरूपक्ष रेड्डी व अंकित लोढा यांचाही सत्कार करण्यात आला.

संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे अध्यक्ष नितिन कोल्हे व संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपिन कोल्हे यांनी सर्व यशस्वी विध्यार्थ्यांचे अभिनंदन केले तसेच उपक्रमाचेही कौतुक केले.